

Local body elections
esakal
नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वच भागांमध्ये प्रचंड राडे दिसून आले. तसेच, राजकीय पक्षांनीही परस्परांवर बेफाम चिखलफेक केली. मतदारांना ‘रेवड्या’ वाटण्याची प्रवृत्ती बळावल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले. एकूणच, निवडणूक आणि राजकीय व्यवस्थेचे अधःपतन झाल्याचे या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत. त्या जिंकणे किंवा हरणे तर मुळीच नाही. आपण अनेकदा पाहतो की अगदी एका मतानेही पराभव झालेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार तर केवळ एका मताचे गडगडले होते. त्याने वाजपेयी किंवा त्यांच्या पक्षाचे काही बिघडले नाही. समाजवादी विचारांचे कैक त्यागी व प्रामाणिक कार्यकर्ते निवडणुकांत थोडक्या मतांनी पडले. पण त्यामुळे ना त्यांचे कार्य डागाळले, ना त्यांची प्रतिष्ठा. त्यामुळे निवडणूक हा अटीतटीचा सामना असूनही तोच काही जीवनाचे सर्वस्व नसतो. वेळ निघून जाते, संधी गमावली जाते, हे खरे आहे. पण राजकारण करायला मिळणारा वेळ व संधी दुपटीने वाढलेली असते हे कोणी लक्षात घेत नाही. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांनाच कितीतरी अधिक वाव असतो. अर्थातच ‘कार्यकर्ते’ म्हणून सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांमध्ये एवढा समजूतदारपणा क्वचित असतो. खरा कार्यकर्ता हा ‘राजकीय क्रियाशील सदस्य’ असतो. त्याच्यावर राजकीय विचारसरणीचे प्रशिक्षण, कार्यपद्धती व चारित्र्याची जपणूक यांचे संस्कार झालेले असतात. किंबहुना ते करवून घेऊन त्यात पारंगत झाल्याशिवाय कोणी कार्यकर्ता झाल्याचे मानत नाही.