

A globe divided by brick walls symbolizing the end of globalization.
esakal
जागतिकीकरणानंतर जग परस्परावलंबी, परस्परपूरक होणार आणि त्यातून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होणार, असे गृहीत होते. भांडवल, श्रम, तंत्रज्ञान यांच्या मुक्त आदानप्रदानातून ‘अवघे धरू सुपंथ’ ही स्थिती साध्य होईल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध संपल्यानंतर याचा आढावा घेतला, तर काय दिसते? ज्या देशात श्रमशक्ती आहे; पण भांडवल नाही आणि ज्यांच्याकडे भांडवल आहे; पण परवडण्याजोगी श्रमशक्ती नाही, त्यांच्या परस्परसहकार्यातून काही आर्थिक उद्दिष्टे साध्य झाली. गरीब देशांतील दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले. परंतु पुढच्या काळात ही प्रक्रिया निर्वेध राहिली नाही. जागतिकीकरणात अनुस्यूत असलेल्या उदारीकरणाला, मुक्तिदायी प्रक्रियेला ठिकठिकाणी अडथळे निर्माण केले गेले. हितसंबंधांना थोडाही धक्का सहन करायचा नाही, ही वृत्ती वाढली. जे बडे औद्योगिक देश गरीब देशांना जागतिकीकरणाला सामोरे जा, उदार धोरण स्वीकारा, असा उपदेश करीत होते, त्यांनी स्वतःच कोशात बंदिस्त व्हायला सुरुवात केली. स्थलांतराला तीव्र विरोध सुरू झाला. सगळ्यांनीच कुंपणे बांधायला सुरुवात केली.