
Bonded labor rehabilitation
esakal
मुक्त झालेल्या वेठबिगार तरुणांनी पुनर्वसनात तहसीलदारांकडे ट्रक मागितला. ते ऐकून तहसीलदार एकदम खवळले. त्यांनी वेठबिगारांना शिव्या दिल्या. त्यांना संताप अनावर झाला; परंतु ते काहीच न बोलता निघून गेले. मीही माझ्या संतापाला आवर घातला. बराच विचार केला अन् एक योजना आखली. ती फत्ते झाली. एका पत्राने जादू झाली आणि तहसीलदारांनी ‘भाऊ, आपण पुनर्वसनात ट्रक मिळवून देऊ’ असं आश्वासन दिलं... तिथेच पुनर्वसनाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
बोड्याचे काही वेठबिगार मुक्त झाले होते. ते वेठबिगारीत असताना बहुतेक जण मालकांच्या वीटभट्टीवर विटा भरणं, विटा करणं, शेतीची कामं करणं, अशी काम करीत. त्यांच्यातील पद्मन, नाशिक, गणपत, जानू अशा काही मुक्त झालेल्या वेठबिगार तरुणांनी एकत्र येऊन मला सांगितलं होतं, की ‘भाऊ, आम्हाला पुनर्वसनात गाडी-जोडी नको; कारण आमच्याकडे शेती नाही. आम्ही बैल कुठे चालवू? आम्हाला बकऱ्या पण नकोत; कारण आमच्याकडे रानच नाही. आम्ही त्यांना कुठल्या रानात चरायला नेणार?’ त्यांचं म्हणणं वास्तववादी होतं. मी तेव्हा त्यांना सहज विचारलं, की ‘मग काय पाहिजे तुम्हाला?’ तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, ‘आपल्याला ट्रक बघायला पाहिजे भाऊ.’ मी त्यांचं बोलणं हसण्यावारी नेलं. या गाडी-जोडीच्या पैशांमध्ये कसा काय ट्रक येणार? त्यांनी सुचविलेला हा पर्याय तेव्हा मला व्यवहार्य वाटला नाही, म्हणून मी त्याकडे खास लक्ष दिलं नव्हतं; परंतु त्या लोकांच्या डोक्यात ट्रकशिवाय दुसरं काहीच नव्हतं. अस्तित्वात असलेल्या पुनर्वसनाच्या कोणत्याच शासकीय योजना त्यांना घ्यायच्या नव्हत्या. मुक्ततेनंतर ते मालकांकडे पुन्हा वेठबिगारीत गेले नाहीत; परंतु ते मजुरी करीत होते. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन झालं नाही, हे वास्तव होतं.