

Struggles of a Marathi Theatre Actor
esakal
डॉ. मिलिंद शिंदे
चेष्टा करणं सोपं… त्यांच्यासारखं काम करणं किती अवघड… आपण त्या पॉजबद्दल चर्वण करत बसतो. खिदळत बसतो. पण इतका समर्पक, अर्थवाही पॉज आपण घेऊ शकू का ? जमेल का आपल्याला ? यावर होईल का चर्चा… अर्थात इथे दोन्ही वर्ग आहेत अभ्यासणारे आणि खिदळणारे. पण खिदळणाऱ्यांची संख्या जास्त. ‘कळत नकळत’ सिनेमात त्यांनी केलेला लहानग्या बच्चू सोबत निरोप घेतानाचा सीन खूप शिकवतो. दरवेळी चित्रपट पाहताना रिवाइंड करून तो सीन पाहतो. त्यात त्यांनी ज्या बारकाव्यांसहित सीन केलाय, धांडोळा घेणाऱ्या प्रत्येकासाठी एक अप्रतिम नमुनाच…
दोन वेळा चान्स हुकला...
फार वाईट वाटत होतं… अतिशय चांगल्या भूमिका आपल्या हातून सुटल्या.
गजेंद्र अहिरे ‘पांढर’ नावाचा सिनेमा करत होता. अतिशय अप्रतिम कथानक असलेला आणि त्यातली मध्यवर्ती भूमिका कुणालाही करावीशी वाटावी अशीच… पण काही कारणानं माझा चान्स हुकला… कारण त्या वेळी मी तितका लोकांना माहीत नाही. असं असावं असा मी माझा समज करून घेतला आणि पाहू नंतर म्हणून विषय सोडला (?) पण नंतरचा बराच काळ एक चांगली व्यक्तिरेखा निसटली याचं शल्य राहिलं…
दुसरा चान्स ‘इंडियन मॅजिक आय’ ही संस्था ‘पिंपळपान’ या शीर्षकांतर्गत अनेक कादंबऱ्या, नाटकांना ती मालिकांच्या रूपात आणत होती. त्यातली एक कादंबरी गजेंद्रच्या वाट्याला आली. अरुण साधू यांची ‘त्रिशंकू’ दलित चळवळीत असलेल्या पण समाजासाठी काही भरीव न करता आलेल्या स्वत:चाच स्वार्थ, स्वत:चंच जग कोरत बसलेल्या तीन तरुणांची ही कथा. त्यातली एक महत्त्वाची आपल्याला मिळावी असं वाटे. त्यात मी काम केलं, पण हवी ती व्यक्तिरेखा मिळाली नाही…