

Traditional Artists in Indian Classical Arts
esakal
डॉ. मुकुंद कुळे - sakal.avtaran@gmail.com
भारतातल्या बहुतांशी नृत्य-गायन कला अशा देवदासी-तवायफ व त्या त्या ठिकाणच्या कलावंत समुदायांनी टिकवलेल्या आहेत, ज्या कालांतराने भारताच्या ‘शास्त्रीय कला’ झाल्या. मात्र या स्थित्यंतरात पारंपरिक कलावंत समूहांचं नामोनिशाण मिटवलं गेलं.
लोककलेचं जतन केवळ कायद्याचा बडगा दाखवून किंवा सेन्सॉरशिपच्या नियमावलीने होऊ शकत नाही. त्यासाठी प्रशासनाने आणि समाजाने अधिक प्रगल्भ भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी, प्रश्न फक्त ‘डीजे लावणी’वरील बंदीचा किंवा सेन्सॉरशिपच्या कडक चौकटीचा नाही; तर लोककलेचं ‘आत्मभान’ टिकवून ठेवण्याचा आहे.
चार दिसांची आज मी न्हाले, का रुसलासी असा
शून्य हा मंचक बघ राजसा...
असो किंवा
अहो भाऊजी मी कोरा माल, मुखी विडा लाल
नरम गोरे गाल... वर तीळ झळझळी
जशी फुलली चाफ्याची कळी गं, बाई गं
असा शृंगारिक आशय ठासून भरलेल्या पारंपरिक लावण्या, गोदावरीबाई पुणेकरांपासून ते पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्यापर्यंत कैक जणी आजवर अगदी सहज सादर करत आल्या. त्या सादर करताना ना कधी त्यांना अवघडलेपण आलं, ना कधी उपस्थित प्रेक्षकांना बुजलेपण. कारण लावणीतला आशय शृंगारिक असला, तरी या कलावंत महिलांचं सादरीकरण कलेच्या पातळीवर उच्च दर्जाचं असायचं. त्यांच्या चेहऱ्यावरील भावकाम असेल किंवा शारीर अदा, सगळ्यांतून नृत्याचे-अभिनयाचे वेगवेगळे रंग-ढंग नजाकतीने आणि संयमाने सादर केले जायचे. अगदी अलीकडच्या काळातील सुरेखा पुणेकर, त्यांच्या ‘या रावजी बसा भावजी’ या लावणीत, समोरच्या प्रेक्षकांकडे रोखून बघत केवळ हस्तलाघवाने बाण सोडत म्हणायच्या - ‘बाण आला का...?’ तेव्हा समोरचा हमखास घायाळ व्हायचा; पण अनाठायी उतावीळ कधीच नाही. कारण मुळात सुरेखाताईंच्या अदेतही संयम असायचा...