

Vaibhav Suryavanshi Cricket Journey
esakal
‘आयपीएल’ स्पर्धा गाजवणारा वैभव बिहारच्या छोट्या गावातून आलेला खेळाडू आहे, जिथे घरात सर्व सोयी सुविधा नसतात पण एकदम पारंपरिक संस्कार केले जातात. त्याचे वडील संजीव सूर्यवंशींनी वेळप्रसंगी कठोर बनत काळजावर दगड ठेवत लहानग्या वैभवला तासन्तास सराव करायला लावलेला आहे.
केवळ नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर कलाकार किंवा खेळाडू कधीच घडत नसतो. त्याला मेहनत, संयम व सातत्याची जोड लागते. मान्य आहे की काही गोष्टी माणसाला देवदत्त मिळतात. अगदी जन्माला आल्यावर त्या सोबत असतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना गाण्याचा वारसा किंवा त्यांचा सुमधुर आवाज निसर्गाने बहाल केला असेल किंवा सचिन तेंडुलकरला फलंदाजीची जाण जात्याच असेल. त्या गुणवत्तेला लतादीदींनी किंवा सचिनने मेहनतीची जी जोड दिली, त्याचे मोल कमी होत नाही उलटपक्षी ते वाढते. हे सांगण्याचे कारण परत एकदा समोर आले आहे ते वैभव सूर्यवंशीने टाटा आयपीएल २०२६ मोसमात फलंदाजीकरता जो काही धुमाकूळ घातला त्याने. सांगायला आनंद होतो, की वैभव सूर्यवंशी अचानक घडलेला खेळाडू नसून घडवला गेलेला खेळाडू आहे. काय आहे त्याची कहाणी आणि क्रिकेट जगतातील महान आजी-माजी खेळाडू त्याच्याबद्दल काय मत व्यक्त करतात ते थोडक्यात मांडतो.