

Peer Review, Pressure & Fear: How Science Is Losing Its Voice
E sakal
Why Suppressing Debate Is Damaging the Future of Scientific Research
डॉ. मिलिंद वाटवे, (लेखक शास्त्रज्ञ आहेत.)
काही वादांमधून संवाद जन्माला येतो. काहींमधून विवाद. पण कुठल्याही ज्ञानशाखेसाठी या दोन्हीची गरज असते. प्रश्न, प्रतिप्रश्न, आव्हानात्मक प्रश्न, खंडन-मंडन हा सगळा एकेकाळी भारतीय संस्कृतीचा भाग होता.
तो नाहीसा झाल्यानंतरच प्रगतीला खीळ बसली. विज्ञानात तर वादांची आवश्यकता संशयातीत आहे. उत्क्रांतीचा वाद, क्वांटम भौतिकीचे अर्थ लावण्यातला वाद, सहसंबंध आणि कारणमीमांसा याच्यातल्या नात्याबद्दलचा वाद अशा अनेक गाजलेल्या वादांनीच विज्ञानाला अधिकाधिक स्पष्टतेकडे नेले.
शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला उत्तेजन दिले पाहिजे, असे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात. पण प्रत्यक्षात अजून इथे ‘गप्प बसा’ संस्कृतीच अधिक करून नांदते. शिक्षणाच्या पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न बाजूला ठेवून एक नवीच चिंता करण्याची वेळ आली आहे.
ती म्हणजे जागतिक पातळीवर आघाडीच्या संशोधकांमध्येच या ‘गप्प बसा’ संस्कृतीचा प्रभाव झपाट्याने वाढत चालला आहे. त्याबरोबरच संशोधनातील नावीन्य आणि सर्जनशीलता घसरणीला लागली आहे, अशी टीका मोठमोठ्या शास्त्रज्ञांनीच केली आहे आणि त्याचा या ‘गप्प बसा’ संस्कृतीशी नक्कीच संबंध आहे.