‘बरं मग तुला मूल आहे आणि घरी तुझे सासूसासरे आहेत मग तू कसं काय मॅनेज करणार?’
हा प्रश्न ऐकून मी चक्रावले. माझ्या १३ वर्षांच्या पत्रकारितेच्या काळात कुणीच मला हा प्रश्न विचारला नव्हता.
मी उत्तर दिलं, माझं कुटुंब आणि माझी नोकरी मला वेगळी ठेवता येते.
पुन्हा प्रश्न आला, ‘नाही म्हणजे इथे रात्रपाळीत काम करावं लागणार तेव्हा तू ते कसं करणार?’
मी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं, ‘मी पत्रकारितेच्या क्षेत्रात इतकी वर्षं काम केलं आहे, त्या कामाच्या आड कधी माझं कुटुंब आलेलं नाही. ना कुटुंबाच्या आड काम आलेलं आहे.’
मला आणखीनही बरंच काही बोलावंसं वाटत होतं पण मी आवरतं घेतलं कारण तुम्ही नोकरी मागायला जात असता तेव्हा तुमची मनस्थिती वेगळी असते.
‘ती’ नोकरी काही मला मिळाली नाही आणि मिळाली असती तरी मी ती स्वीकारली असती का, याविषयी मला खात्री नव्हती.
हे संभाषण एका प्रतिष्ठित संस्थेच्या कार्यालयात घडलं होतं. शिवाय मला असे प्रश्न विचारणारा कुणी पुरुष नव्हता तर बाईच होती. त्या बाईंचं स्वत:चं कुटुंब होतं.
फॉक्सकॉनच्या तामिळनाडू प्लँटचा विषय चर्चेत आल्यानंतर मी माझा हा अनुभव माझ्या टीमशी शेअर केला. त्यावेळी लिंक्डइनवरील निरनिराळ्या चर्चांचाही संदर्भ आला आणि आम्ही या विषयावर लोकांशी बोलायचं ठरवलं.
एकूणच बाई, लग्न आणि नोकरी हे तिन्ही शब्दांचं एकमेकांतली गुंतवणूक किती अवघड आहे, याचं दर्शन घडलं.