

Theatre Group and New Production
esakal
डॉ. मिलिंद शिंदे
‘झुलवा’चे प्रयोग अलीकडं होत नाहीत का?’ अशी विचारणा होत राहायची अधूनमधून. ‘झुलवा’ या नाटकाचा चमू अतिशय मोठा म्हणजे आताच्या व्यावसायिक गणिताच्या लेन्समधून पाहायला गेले तर ‘झुलवा’ म्हणजे सैन्य वाटावं असा मोठा चमू या नाटकासाठी वामनसरांनी योजिला होता. तशी त्याची गरजही होती; पण प्रयोग हळूहळू थंडावू लागले. उत्तम संधीच्या शोधात सगळेच असतात. चारपाच महत्त्वाची पात्रं सोडली तर इतरांना सतत वाटत असतं आपली वेळ कधी येणार? आपण कधी लीड किंवा महत्त्वाचं पात्र करणार? जोपर्यंत ते त्यांच्या आयुष्यात घडत नाही, तोपर्यंत काय करायचं तर ‘झुलवा’ चालूच आहे ना... जोपर्यंत उजवं काही हाती लागत नाही तोवर चालू ठेवू नाटक. उत्तम काही आलं, की देऊ सोडून... या सगळ्यांमुळे नाटकाच्या कलावंत टीमला गळती लागू लागली. पुरेशी कुमक उपलब्ध होईना. परिणामी प्रयोग थंडावले. मागणी तशीच होती. ‘झुलवा’ला आजही मागणी आहे. त्यामुळे जनमानस चौकशी करत असतो, की ‘झुलवा’चे प्रयोग अलीकडं होत नाहीत का?
कोल्हापूरच्या पंचक्रोशीत एक नाटकाचा संघ याच धर्तीवरचं नाटक करत होता; पण त्याचा परिप्रेक्ष्य निराळा होता. ‘जोगत्याचं काम करणाऱ्या एका नटाची मुलाखत सुरू असते आणि त्यातून ते नाटक उलगडत जाते.’ श्री हनुमान तरुण मंडळ, काळम्मावाडी, कोल्हापूर असं या संस्थेचं नाव. मूळ नाटकाचा संघ. या नाटकासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे संपूर्ण समूहात उत्साह होता. कोल्हापूरच्या भूमीत घडत होतं. त्या उत्साहाला वाट शोधायची होती. त्या सगळ्यांच्या मनात कोल्हापुरातलं सिनेमाचं भावविश्व उतरू लागलं. बरं या समूहातले काही आधीच सिनेसृष्टीत सहायक दिग्दर्शक, लेखक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्या सगळ्या विचारांना आणखीच उभारी मिळाली...