पुणे - 'मी पंढरपूरच्या वारीला कधी गेलो नाही, यात अनादराची भावना नाही. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सानिध्य मला लाभले. अशा सर्व संतांचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोचले, तर महिलांविषयी आदर, समानता आणि खऱ्याअर्थाने मानवता धर्माच्या वाटेने ते जातील,'' असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केला.
राष्ट्र सेवा दल आयोजित कार्यक्रमात श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी लिहिलेल्या "उजळवाया आलो वाटा' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रकाश परांजपे, अविनाश पाटील, बापूसाहेब देहूकर, राजाभाऊ चोपदार, शरद कदम, सुभाष वारे आदी उपस्थित होते.
'मी कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करीत नाही. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन मी घेतो; पण त्याचे फोटो किंवा बातमी प्रसिद्ध व्हावी असे मला वाटत नाही. राज्याचा मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची शासकीय पूजा चुकवली नाही,'' असे पवार यांनी सांगितले.
'शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या आत्महत्यांनी मन अस्वस्थ करते. अशा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी संतांचे विचार महत्त्वाचे आहेत. संत नामदेवांनी सुरू केलेली कीर्तन परंपरा ही यात महत्त्वाची ठरू शकते,'' असेही त्यांनी सांगितले.
|