

सरकार १२ रुपयाने
करणार कांदा खरेदी
केंद्रीय कृषिमंत्री चौहान ः नाशिकपासून होणार सुरुवात
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : ‘‘राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक कोंडीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल आहेत. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार ‘नाफेड’च्या माध्यमातून १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे,’’ अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सातारा येथे केली.
सैनिक स्कूलच्या मैदानावर शुक्रवारी (ता.१५) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा व महाआवास अभियानच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या वेळी मंत्री चौहान बोलत होते.
केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
‘‘गेल्या काही दिवसांत कांद्याला बाजारात अगदी एक रुपये एवढा नीचांकी भाव मिळत असल्याने हताश झालेले शेतकरी कांदा फेकून देण्याच्या मनःस्थितीत होते. कांदा हे नाशवंत पीक असल्याने आणि टिकवणक्षमता कमी असल्याने, खरेदी, साठवणूक आणि पुन्हा बाजारात आणणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे काहीही करून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ही पावले उचलली आहेत.’’
विक्रीसाठी कुठे जायचे, यावरून संभ्रम?
पहिल्या टप्प्यात नाशिकपासून ही कांदा खरेदी सुरू होणार आहे. मात्र नेमकी खरेदी केंद्रे कोणती, याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नसल्यामुळे केंद्रावर विक्रीसाठी कुठे जायचे? असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.
केंद्रीय मंत्र्यांची घोषणा;
मात्र क्षेत्रीय पातळीवर गोंधळ
केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सीजमार्फत प्रत्येकी एक लाख याप्रमाणे एकूण २ लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी याबाबत खरेदीच्या अनुषंगाने क्षेत्रीय पातळीवर गोंधळ आहे. दोन्ही एजन्सीज सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहेत. मात्र या संस्थांकडून अद्यापही खरेदीदारांची अंतिम नावे शुक्रवारपर्यंत (ता.१२) जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे याबाबत संभ्रम कायम आहे. तसेच कांदा खरेदीपश्चात साठवणुकीची जबाबदारी यंदा केंद्रीय वखार महामंडळाकडे आहे. तर त्यांच्या माध्यमातून साठवणूक ठिकाणे कोणती आहेत, याचीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडे विचारणा केली असता सांगण्यात आले, की केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कांदा खरेदीप्रक्रिया हाती घेतली आहे. मात्र आम्ही लवकरच खरेदीदार संस्थासंबंधित माहिती जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.