बिबट्याच्या हल्यात २६ कोकरी ठार

दहिटणे, ता. दौंड हद्दीतील घटना
26 lambs killed in leopard attack
26 lambs killed in leopard attackSakal

राहू - दहिटणे (ता. दौंड) हद्दीत काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ आपल्या मेंढ्या व शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले असता पालावर (वाडयावर) ठेवलेल्या मेंढ्यांच्या (पिल्लांवर) कोकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून 26 कोकरांचा फडशा पाडला. संपत सोमनाथ थोरात रा. मिरवडी (ता. दौंड) यांची 15 कोकरी तर नवनाथ जयवंत बोरकर रा. पिंपरी सांडस (ता. हवेली) यांची 11 कोकरी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे मेंढपाळ संपत थोरात व नवनाथ बोरकर यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकरांचे शवविच्छेदन करून पुढील अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याचे वनरक्षक शिवकुमार बोंबले, वनपाल जी.एम. पवार, वन कर्मचारी विलास होले यांनी सांगितले. देवकरवाडी, दहिटणे, मिरवडी, राहू बेटपरिसरात बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

थोरात व बोरकर यांचा शेळ्या मेढ्यांचा वाडा चरण्यासाठी दहिटणे परिसरात मारूती मगर यांच्या शेतात मुक्कामी होता. परिसरात बिबटयाचा वावर वाढलेला असून तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी सभापती मारूती मगर, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, देवकरवाडीचे सरपंच दिलीप देवकर, दहिटण्याचे सरपंच बापूराव कोळपे, मच्छिंद्र मगर, शरद कोळपे, कृष्णा शेळके , जालिंदर शेंडगे, ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनवलकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

बिबटयाने कोकरांवर हल्ला करून ऊसाच्या शेतात फरफटत नेले. परिसरात उसाचे, वनविभागाचे अधिक क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परस्थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फाटके वाजवा. बॅटरीचा उजेड करा. बिबटया अचानक दिसल्यास पाठलाग करू नका. असे आवाहन वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : मारुती मगर

राहू बेटपरिसरात बिबट्याचा अनेक वर्षांपासून वावर वाढलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यात आजतागायत अनेक प्राणी फस्त झाले आहेत. बिबट्याने माणसांवर हल्ला केल्यावर वन विभागाला जाग येणार का..? वन विभाग नेहमीच पिंजरे लावण्यास टाळाटाळ करून हात झटकत आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवत असल्यामुळे होणाऱ्या घटनांना वन विभागाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी माजी सभापती मारुती मगर यांनी केली.

जबाबदार अधिकारीचा मोबाईल नंबर मात्र स्विच ऑफच..

दौंड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल त्यांच्या सवयी प्रमाणे स्विच ऑफ लागत होता याबाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com