तलाठी महोदयांच्या चुकीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 33 वर्षांचा लढा

तलाठी महोदयांच्या चुकीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 33 वर्षांचा लढा

मंचर : शनिवारवाड्यात पेशव्यांच्या गादीसाठी घडलेला रक्तरंजित इतिहास सर्वश्रुत आहे. राघोबा पेशव्यांनी 'नारायणरावांना धरण्याचा' आदेश गारद्यांना दिला. परंतू त्या आदेशात आनंदीबाईनी 'धरण्या'ऐवजी 'मारणे' असा बदल केला. त्यानंतर घडलेला  इतिहास सर्वांना ठाऊक आहे. तसाच प्रकार एकलहरे (ता. आंबेगाव) येथील कामगार तलाठ्याकडून झाला. सिताबाई महादेव काळंबे हे खरे नाव असताना तलाठी यांनी फेरफार व सातबारा उताऱ्यावर आडनाव काळंबे असताना कांबळे केले. शेवटच्या दोन अक्षरांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३३ वर्षांपासून शिंदे कुटुंबातील तीन पिढ्यांचा लढा सुरु आहे. पण अजूनही काम प्रलंबितच राहिले आहे.

आंबेगावचे तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन दुरुस्तीचे आदेश तीन वर्षांपूर्वी कामगार तलाठी एकलहरे यांना दिले होते. तिसऱ्या पिढीचे वारसदार मयूर अशोकराव शिंदे अजूनही प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही दुरुस्ती न झाल्याने महसूल खात्याचा ढिसाळ कारभार दिसून येतो आहे.

मयूर शिंदे म्हणाले, ''माझे आजोबा (स्व) रामचंद्र पांडुरंग शिंदे यांची सीताबाई काळंबे बहिण आहे. आडनावात तलाठ्याकडून झालेली चूक आजोबांच्या लक्षात आली. त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. १६ वर्षांपूर्वी आजोबा स्वर्गवासी झाले. माझे वडील अशोक रामचंद्र  शिंदे (वय ६०) यांनीही  दुरूस्तीसाठी प्रयत्न केले. आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांचे कोर्टात पुरावे सादर केले. सुनावणी झाली. ता.18 जानेवारी 2018 रोजी सबनीस यांनी कांबळे हे हस्तदोषाने झालेले आडनाव काळंबे असे दुरुस्त करावे, असे आदेश कामगार तलाठी सुलतानपूर यांना दिले. पण या आदेशालाही केराचीच टोपली दाखविण्याचे काम झाले आहे. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाला सुरुंग लावणाऱ्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे." 

तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या आदेशाची प्रत कामगार तलाठी एकलहरे यांना दिली. फक्त १० मिनिटांच्या कामासाठी दोन वर्ष ११ महिने झाले. हेलपाटे मारून दमून गेलो. आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. चूक त्यावेळच्या तलाठ्याची आहे. पण मनस्ताप आम्हाला करावा लागत आहे. 'सकाळ'मध्ये आलेली 'वडिलांच्या वर्षश्रद्धानंतरही वाटपपत्र होईना' अशी बातमी वाचली. आता मला 'सकाळ' न्याय देईल असा विशास आहे. -अशोकराव रामचंद्र शिंदे,सुलतानपूर (ता.आंबेगाव)

'वडिलांच्या श्राद्धानंतरही वाटपपत्र होईना' 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीने महसूल खात्यात खळबळ उडाली होती. सोशल मिडियावर याच बातमीची चर्चा होती. बातमीचे नागरिकांनी स्वागत केले. बातमी वाचल्यानंतर प्रलंबित कामासाठी अनेकांनी तलाठी व मंडल कार्यालयात धाव घेतली. तुमचे काम मार्गी लावतो पण 'सकाळ'कडे व्यथा मांडू नका. असे संबंधिताकडून सांगितले जात आहे. 'सकाळ'ने अशा प्रकारच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध करून झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला वठणीवर आणण्याचे व जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. -अँड. बाळासाहेब बाणखेले, कामगार नेते मंचर.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com