पाऊस डोक्यावर असताना पुण्यातील 900 कुटुंबांचा संसार उघड्यावर

giravali
giravali

मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात रमाई घरकुल योजनेच्या 900 लाभधराकांचा संसार उघड्यावर पडला आहे. शासकीय अनुदानाअभावी लाभधारकांची परवड झाली असून, अनुदानाच्या प्रतीक्षेत ही कुटुंबे आहेत. काहींनी आपला संसार समाज मंदिरामध्ये, गोठ्यात किंवा ताडपत्रीची झोपडी उभारून सुरु केला आहे. वारा व पावसाच्या समस्येने ही कुटुंब त्रस्त झाली आहेत.

       
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील गरीब बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लाभधारकांना रमाई घरकुल योजनेमार्फत पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यात २३२ चौरस फूट घरकुलासाठी एक लाख ३१ हजार रुपये अनुदान दिले जाते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २०१९-२० या वर्षासाठी ही योजना राबविली आहे. त्यासाठी तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फत लाभधारकांची निवड केली जाते. मंजुरीचे आदेश आल्यानंतर ग्रामपंचायतींनी संबंधित लाभधारकांना घरकुल बांधण्यासाठी सांगितले. 
त्यानुसार लाभधारकांनी शासकीय अनुदान मिळणार, या विश्वासाने स्वतःजवळ असलेले पैसे खर्च करून काही लाभधारकांनी घरकुलांचे पाया खोदुन ठेवले आहेत. काहींनी भिंती उभ्या केल्या आहेत. काही लाभधारकांनी ओळखीच्या दुकानदारांकडून उधारीवर विटा, पत्रे, सिमेंट, असे साहित्य खरेदी केले आहे. शासकीय अनुदान आल्यावर दुकानदारांना पैसे देऊ, या भरवशावर त्यांनी घरकुल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता दुकानदारांच्या तगाद्याला त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

"आंबेगाव तालुक्यात  रमाई घरकुल योजनेंतर्गत ३५ लाभधारकांची यादी आॅगस्ट २०१९ मध्ये मंजूर झाली. पण, जून महिना उजाडला तरी देखील एक रुपयाही अनुदान अद्याप मिळाले नाही," असे गिरवली येथील लाभधारक प्रियांका अविनाश अभंग यांनी सांगितले.

"कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून संचारबंदी असल्याने बऱ्याच लोकांना घरकुलचे बांधकाम करता आले नाही. तर, काही लाभधारकांना दुकान बंद असल्याने साहित्य मिळाले नाही. आता काही ठिकाणी दुकाने सुरु झाली आहेत, पण पैसे नसल्याने व अनुदानही आले नसल्याने पाऊस डोक्यावर आला असताना रमाई घरकुल अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे लाभधारकांची ससेहोलपट सुरु आहे. मागासवर्गीय समाजाची परवड थांबवा. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे," अशी माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली.

"अतिदुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबाना पावसाळ्याअगोदर चार महिने पुरेल एवढे धान्य, सरपण व जनावरांसाठी  कोरडा चारा साठवून ठेवावा लागतो. पण, उघड्यावर संसार असल्याने चारा व धान्य भिजत असल्याने नुकसान होत आहे," असे घरकुल योजनेचे अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले कोंडवळ येथील शीला भीमराव गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com