आळंदीकर म्हणतात, आषाढी वारीची तारीख ही असावी

Wari
Wari

आळंदी (पुणे) : लॉकडाउनचे नियम शिथिल न झाल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाचे पालन करत आणि वारकऱ्यांचे आरोग्य जपत यंदाच्या वर्षीचा माउलींचा पालखी प्रस्थानचा सोहळ्यातील आषाढी वारी मोजक्याच वारकऱ्यांना बरोबर घेऊन होणार असल्याचे नुकतेच आळंदी देवस्थानने जाहीर केले. त्याला अनुसरून आळंदीकर ग्रामस्थांनीही माउलींचा सोहळ्याचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला (१३ जून) न करता थेट आषाढ शुद्ध दशमीला (३० जून) करून यंदाची आषाढी वारी अवघ्या २० वारकऱ्यांसमवेत पार पाडण्याची लेखी सूचना आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानला आज केली. 

याबाबत आळंदीकर ग्रामस्थांकडून सह्यांचे निवेदन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांना दिले. कोरोनामुळे जगावर महामारीचे संकट आले आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह पंढरपुरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच आळंदीच्या वेशीवर चऱ्होली बुद्रुक, मोशी आणि दिघीतही कोरोनाचे रूग्ण सध्या आढळले. हा कोरोनाचा परिणाम पाहता आळंदीतील आषाढी वारी भरेल याबाबत सध्या अनेकांना शंका आहे. त्यातच आळंदी देवस्थानने आषाढी वारीबाबतचा सोहळा यंदाच्या वर्षी कशा स्वरूपात पार पाडावा, याबाबत दिंडीकरी फडकरी वारकऱ्यांकडून सूचना मागविल्या. याबाबत नुकतेच फडकरी, दिंडीकरी यांच्यासोबत आळंदी देवस्थानची व्हिडीओ कॉन्फरन्सही पार पडली. त्या अनुषंगाने आळंदीकर ग्रामस्थांनीही सुरक्षेच्या कारणास्तव आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वारी काळात वारकऱ्यांना होऊ नये, यासाठी देवस्थानला निवेदन दिले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या निवेदनमध्ये ग्रामस्थांनी म्हटले की, यंदाच्या वर्षीचा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सरकारच्या नियमांना अधिन राहून पार पाडावा. वारीचा ऐतिहासिक सोहळा असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होणे अपेक्षित आहे. देशातील सध्याची आपत्कालिन व्यवस्था पाहता माउलींचा आषाढी वारी सोहळा हा पंधरा ते वीस व्यक्तींच्याच उपस्थितीत होणे आवश्यक आहे. यामध्ये पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाज्या, झेंडेकरी, तुळश घेणारी महिला वारकरी आणि पुजारी, अशा मोजक्याच लोकांना बरोबर घेऊन सोहळा पार पाडावा. त्याचप्रमाणे आषाढ शुद्ध दशमीला ३० जून रोजी सकाळी सहा वाजता माउलींच्या मंदिरातून साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान करावे. माउलींच्या पादुका ट्रकमध्ये अथवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात. सोहळा वाटेत कोठेही न थांबवता थेट पंढरपूरला न्यावा. सरकारच्या नियमानुसार एकादशीला (ता. १ जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पुन्हा आळंदीकडे प्रयाण करावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com