आवरूया घबराटीचा ब्रम्हराक्षस!

Corona-Virus
Corona-Virus

‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस’ ही म्हण सध्या आपल्याला लागू होते. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे, हे खरे आहे, पण किरकोळ लक्षणांना घाबरून हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचा अट्टहास गरजू रुग्णांवर अन्याय करणारा आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घरी उपचार घेऊनही कोरोना बरा होतो. त्यामुळे यापुढचा टप्पा आपली खरी परीक्षा पाहणारा असेल, त्याचा मुकाबला स्वयंशिस्तीने आणि धाडसानेच करावा लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णसंख्या वाढल्याने १४ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. या पाच दिवसांत रूग्णसंख्या सहा-साडेसहा हजाराने वाढली. या काळात तपासणीची संख्याही दोन हजारांनी वाढली खरी. पण अद्यापही आपल्याला तपासण्यांची संख्या आणि वेग वाढवावा लागेल. त्यानंतरच ‘कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’ योग्य पद्धतीने होऊन, नव्या रुग्णांची साखळी तोडणे शक्‍य होईल.

लॉकडाउनमुळे रूग्णसंख्या कमी झाली किंवा वाढली हा निष्कर्ष काढणे घाईचे होईल. पण संख्या वाढणारच आहे, हे गृहीत धरूनच आपल्याला उपाययोजना करावी लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा ससूनचे अधिष्ठाता बदलले. नंतर महापालिका आयुक्त. या बदलांनंतर रूग्णसंख्या आटोक्‍यात आणण्यात किती यश आले, हेही राज्यकर्त्यांना सांगावे लागेल.

लॉकडाउनच्या कुबड्या २४ जुलैपर्यंतच वापरता येतील. त्यानंतर नागरिकांना घरात बसविणे अशक्‍य होणार आहे. मागच्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमधून परिस्थिती सुधारेल अशा कोणत्याही ठोस उपाययोजना ना केंद्र सरकारने ना राज्य सरकारने केल्या आहेत. ‘दिवे लावा’, ‘थाळी वाजवा’ अशी स्वतःच्याच ‘मन की बात’ सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले अनेक दिवस नागरिकांसमोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुरुवातीला आश्‍वासक वाटणारी आश्‍वासने प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत. त्यामुळे घरी बसलेल्या नागरिकांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार काही करेल, यावरही नागरिकांचा विश्‍वास बसलेला नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवावेच लागणार आहे. त्यानंतर काय, हा खरा प्रश्‍न असून, पुण्यात तरी उपचारासाठी ‘बेड’ नसणार हेच उत्तर आहे. 

याच कारणासाठी गेली दोन-तीन दिवस प्रशासनाकडून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी घरूनच उपचार घ्यावेत, असे सांगण्यात येत आहे. खासगी रूग्णालयांनी घरी उपचाराची दणादण ‘पॅकेज’ जाहीर केली आहेत. पुण्यात सगळे मिळून, १८ हजार बेड आहेत. अर्थात ही सरकारी आकडेवारी आहे.

सध्या १३ हजार ॲक्‍टिव्ह रुग्ण आहेत. रूग्णसंख्या हजार-दीड हजाराने रोज वाढतेय, म्हणजेच परिस्थिती गंभीर आहे. मात्र, आतापर्यंत २१ हजार रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे न घाबरता योग्य ती काळजी घेऊन, हा ब्रम्हराक्षस सहजपणे दूर ठेवता येईल, हे नक्की! 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com