

लोकसंग्राहक नेता
..............
श्रीगोंदे, ता.८ : कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य शेतकऱ्याची असताना केवळ जनसामान्यांच्या बळावर अन निसर्गदत्त नेतृत्वगुणांमुळे राज्य पातळीवरील नेत्यांत ज्यांची गणना होते ते , ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची आजही राज्यभर ओळख आहे.
काष्टी (ता. श्रीगोंदे) सारख्या गावातील एका छोट्या शेतकरी कुटुंबातील तरुणाला आईच्या इच्छेखातर वकील व्हायचे होते. त्यासाठी अहमदनगरला ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले. आर्थिक चणचण आणि शहरी विरुद्ध ग्रामीण असा विद्यार्थ्यांमधील भेदभाव त्यांना आतून अस्वस्थ करीत असे. विद्यार्थ्यांच्या फी माफीचा विषय तेव्हा गाजत होता. याबाबत जेव्हा आंदोलन झाले त्याचे नेतृत्व आपसुकपणे पाचपुतेंकडे आले. महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीसाठी निवडणूक झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आयुष्यातील पहिली निवडणूक ते जिंकले, अन् सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन घरी आले. १९७८ साली श्रीगोंदे विधानसभा निवडणूक झाली. वय कमी असल्याने ती लढवता आली नाही. त्यानंतर झालेल्या पंचायत समितीची निवडणूक मात्र काष्टी गणातून लढवली, अन् बाजी मारली. राज्यातील पुलोद सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केले, अन् विधानसभा निवडणुका आल्या. तेव्हा देशभर इंदिरा गांधींची लाट होती. जनता पक्षप्रमुख विरोधी पक्ष होता. जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ए फॉर्म वेळेत दाखल केला नाही, म्हणून त्यांना जनता पक्षाचे नांगरधारी शेतकरी चिन्ह मिळू शकले नाही. छत्री चिन्ह घेऊन ते उभे राहिले. अन् आश्चर्यकारकरित्या पहिला विजय मिळवला.
१९९१ साली पाचपुते यांनी जनता पक्षाच्या डझनभर आमदारांसह नाईक सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात त्यांना ''गृहराज्यमंत्री'' पदाची लॉटरी लागली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने ते थेट राष्ट्रवादीच्या आमदार व मंत्र्यांचे हायकमांड झाले. २०१९ साली त्यांनी श्रीगोंद्यात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलवले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्यामागे ताकद उभी करीत त्यांना आमदार केले.
आमदार असो की नसो, मंत्रिपदाचा दिवा असला काय अन् नसला काय, वागण्या-बोलण्यात व जनसंपर्कात कसलाच बदल त्यांनी जाणवू दिला नाही. सामान्य माणसात रमणे, त्यांच्या सुखदुःखात एकरूप होणे, अडीअडचणीला धावून जाणे, रात्री-अपरात्री केव्हाही सहजपणे फोनवर उपलब्ध होणे, अन् अडचणीत असलेल्यांना (मग तो विरोधक असला तरी) मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. चार दशकांच्या राजकारणातील त्यांचा हा ऊर्जास्रोत आहे. आजही ते तितक्याच उत्साहाने लोकांमध्ये रमतात. आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शकाची भूमिका ते सार्थपणे निभावत आहेत.
-समीरण बा. नागवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.