Baramati Loksabha Election : अजित पवारांनी बारामतीकरांपुढे मांडला मतदानाचा फॉर्म्युला....

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक बारामतीकरांना आपल्यापुढे बाका प्रश्न निर्माण झाल्यासारखे वाटते, आता काय करायचे याची चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal

बारामती - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक बारामतीकरांना आपल्यापुढे बाका प्रश्न निर्माण झाल्यासारखे वाटते, आता काय करायचे याची चर्चा सुरू आहे. दोन उमेदवार आता समोर आले आहेत. पण तुम्ही इतके वर्ष ज्या पद्धतीने पवारांच्या पाठीशी उभे होतात, त्याच पद्धतीने तुम्ही या निवडणुकीतही पवारांच्या पाठीशी उभे राहा, जेथे पवार आडनाव आहे तेथीलच बटण दाबायचे, ही परंपरा खंडित करायची नाही.

इतके दिवस तुम्ही नेत्याला म्हणजे अजित पवारांना, नंतर वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना निवडून दिलं, नंतर लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या म्हणजे फिट्टं फाट होऊन जाईल. त्यामुळे वडीलही खुश, लेकही खुश सुनही खुश आणि बारामतीकरही खुश....अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांपुढे मतदानाचा फॉर्म्युलाच मांडला.

बारामतीत आजी माजी पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारच्या विकास निधी सोबतच केंद्राच्या विकासनिधीची जोड मिळाली तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल, या उद्देशाने महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीत मंगळवारी (ता. 9) आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. सर्वांगिण विकासाच्या मुद्यांचा आढावा घेत या पुढील काळातही विकासासोबत राहण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

जिरायत भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून निवडणूक झाल्यानंतर या योजनेवर काम केले जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर मी तुम्हाला स्वप्न दाखवतोय असे समजू नका मी जे काही केले आणि भविष्यात करणार आहे तेच मी तुम्हाला सांगतोय असं सांगायला अजित पवार विसरले नाही.

लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर केंद्र व राज्यात एका विचाराचे सरकार असणे आवश्यक असते, केवळ विरोधाला विरोध करण्यात अर्थ नाही. कोणी कोणाचा कायमचा शत्रू मित्र नसतो. आज देशाचा कल नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असाच आहे ही बाब विचारात घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधात मीदेखील बोललो होतो सभा घेतल्या होत्या मात्र विरोधाला विरोध करून चालत नाही आज देशातील बहुसंख्य लोकांचा कल हा नरेंद्र मोदी यांनीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे असा आहे सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुती सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे ही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

18 एप्रिलला तीन उमेदवार अर्ज भरणार...

बारामती, पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ व शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या 18 एप्रिल रोजी पुणे येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे या दिवशी उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात मोठी सभा घेतली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी या तिन्ही मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसह व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com