पुणे - नक्षलवाद, खलिस्तान चळवळ वा ईशान्य भारतातील वांशिक वाद असो, सध्या शांत असला तरीही संपलेला नाही. त्याला पोषक वातावरण मिळाल्यास पुन्हा डोके वर काढण्याचा धोका अद्यापही कायम आहे. त्याच वेळी ‘नार्को टेररिझम’ हे अंतर्गत सुरक्षिततेपुढे भविष्यात आव्हान राहील, असे महाराष्ट्र आणि पंजाबचे निवृत्त पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी मंगळवारी येथे सांगितले.
‘सकाळ साप्ताहिक’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अंतर्गत सुरक्षा- सद्य-स्थिती आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि संपादक-संचालक श्रीराम पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
विर्क म्हणाले, ‘‘‘ड्रग्ज’ हे समाजविघातक आहे. यातून मिळणाऱ्या पैशांवर दहशतवाद पोसला जातो. त्यामुळे ‘नार्को टेररिझम’ समूळ नष्ट केले पाहिजे. जैश-ए-महंमद किंवा लष्कर-ए-तोयबा या सगळ्या दहशतवादी संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘अल कायदा’शी संबंधित आहेत. त्याच्या ‘स्लिपर्स सेल’ भारताच्या काही भागांत असल्याने देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी दक्ष असले पाहिजे.’’
‘‘अंतर्गत सुरक्षिततेसाठी संघटित गुन्हेगारी हे आणखी एक आव्हान आहे. ड्रग्ज, क्राइम अशा माफियांना नियंत्रित ठेवले पाहिजे. देशात जगभरातून गुंतवणूक व्हावी, नवे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न होतात. पण, देशातील जनजीवन सामान्य नसेल, तर कोणता उद्योग येथे येणार नाही.
उद्योगांसाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण आवश्यक असते. गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्यास बाहेरच्या देशातून गुंतवणूकदार येणार नाहीत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षितता ठेवण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते.
नक्षलवाद - २००४ नंतर छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत डोके वर काढले. पोलिसांवर, सुरक्षा यंत्रणांवर हल्ले केले. राज्यांच्या संयुक्त कारवायानंतर २००७-०८ पासून ही चळवळ कमी झाली. पण, त्यावर बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे.
वंशभेदाची चळवळ - मिझोलॅंड, बोडोलॅंड, नागा, त्रिपुरा, आसाम या भागांत स्वातंत्र्योत्तर काळात चळवळ सुरू झाली. काही प्रश्न सोडविले. त्यामुळे याची तीव्रता कमी झाली असली तरीही काही समस्या कायम आहेत.
खलिस्तान चळवळ - स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी सत्तरच्या दशकात सुरू झालेले हिंसक आंदोलन १९९४ ला संपले. पण काही दिवसांपूर्वीच ड्रोनने हत्यारे टाकल्याची माहिती पुढे आली. हे काळजीचे आहे.
काश्मीर - काश्मीरमध्ये आता बदल झाला आहे. मोठ्या संख्येने एकत्र येऊन होणारी आंदोलन आणि दगडफेक या समस्या आहेत. पण, ३७० कलम काढून टाकणे हा सरकारचा चांगला निर्णय आहे.
पोलिसांना सायबर तंत्रज्ञान आणि त्याची अद्ययावत माहिती असणे अत्यावश्यक आहे. हॅकर्स बॅंकांमधील पैसे काढून घेण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यावर लक्ष देणे, ही काळाची गरज आहे.
पोलिस शत्रूशी लढत नाही. हा लढा आपल्या लोकांशी असतो. त्यामुळे कधीही पहिली गोळी आम्ही चालविली नाही.
- एस. एस. विर्क, निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र आणि पंजाब
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.