Pune News : पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या तलावात कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी; हजारो माशांचा मृत्यू

कुरकुंभ परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस
Chemical effluents companies in ponds near Pune-Solapur highway fish die biodiversity
Chemical effluents companies in ponds near Pune-Solapur highway fish die biodiversity sakal

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी चार किलो मीटर अंतरावरील मळद येथील पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या तलावात आल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला असून मासे खाण्यासाठी बगळे व इतर पक्षांनी गर्दी केल्याने त्यांच्या आणि पाळीव जनावरांच्या जिवीतालाही धोका संभवतो.

तलावात येणारे केमिकलयुक्त सांडपाणी त्वरित बंद करून ते सोडणाऱ्या कंपन्यांविरूध कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कुरकुंभ परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. या पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांनी साठून ठेवलेले केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता परिसरात सोडून दिले आहे.

हे केमिकलयुक्त सांडपाणी ओढ्याद्वारे वसाहतीपासून चार किलो मीटर अंतरावर असलेल्या मळद येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या तलावात आल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. तलावाच्याकडेला मृत माशांचा खच दिसून येत आहे.

या मृत माशांची दुर्गंधी सुटली असून याचा ञास परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. मृत मासे खाण्यासाठी बगळे, गिधडे इत्यादी पक्षांचे थवे जमा होत आहेत. केमिकलमुळे मृत झालेले मासे खाल्याने या पक्षांच्या जिवीतास धोका संभवतो. तलावातील पाणी पिण्यास पाळीव जनावरे, शेळ्यामेंढ्या जात असल्यास त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी जनावरे तलावातील पाणी पिण्यास जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मृत माशांमध्ये चिलापी, रव, मरळ इत्यादी माशांचा समावेश असल्याचे दिसून येते.

चार दिवसांपूर्वी या तलावातील मासे पकडून त्यांची विक्री जवळच्या बाजारपेठांमध्ये केली जात होती. वसाहतीतील कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी परिसरात सोडत असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे २५ सप्टेंबर २०२३ रोजी सिप्ला कंपनीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केली होती.

याबाबत खासदार सुळे यांनी प्रदुषण मंडळांच्या अधिकाऱ्यांना विचारले असता केमिकलयुक्त सांडपाणी सोडणे बऱ्यापैकी कमी झाल्याचे उत्तर दिल्याने ग्रामस्थांनी बैठकीत नाराजी व्यत्त केली होती. केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे मळद तलावातील माशांच्या मृत्यूने प्रदुषण मंडळाचा दावा पाच दिवसांमध्ये खोटा ठरला आहे.

वसाहतीतून तलावात येणारे केमिकलयुक्त सांडपाणी त्वरित बंद करावे. तसेच हे सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरूध कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com