मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर

पुणे : ‘‘राज्यातील सध्याच्या राजकारणात शिळेपणा आलेला आहे. त्यामुळे राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात राज्यातील राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही,’’ असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी दोघांत मराठा आरक्षणाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. यावेळी ॲड. आंबेडकर यांनी संभाजीराजेंना बहुजन समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहनच केले. ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता दोनच पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.’’

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार संभाजीराजे भोसले यांनी सरकारला शुक्रवारी तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच पाच मागण्याही सरकारकडे केल्या आहेत. तीन पर्याय आणि पाच मागण्यांवर येत्या सहा जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देवू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

आरक्षण व्यवस्थेशी जोडण्याचा भाग :

संभाजी महाराजांनी घेतलेल्या विषयात राजकीय पक्षांना कधीच रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्द्यावरच डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने आरक्षण मान्य केले आणि बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. आरक्षण हा व्यवस्थेशी जोडण्याचा भाग आहे. संभाजीराजेंशी चर्चा करत असताना आरक्षणावर चर्चा झाली. पण हा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर राजसत्तेची गरज आहे, हा विचार पुढे आला. या चर्चेचा हा मुख्य गाभा आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

संभाजीराजेंबरोबर जायला तयार :

संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असे वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com