Ashok Gehlot
Ashok Gehlotsakal

Ashok Gehlot : शिक्षणात खासगी शिक्षणसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण; मुख्यमंत्री अशोक गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

पुणे : ‘‘राजस्थानचा मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खासगी शिक्षण संस्थांचे काम पाहिले. तेथील शिक्षण पद्धतीचे अनुकरण करून राजस्थानमध्ये त्यानुसार शिक्षण सुरू केले. आज राजस्थानने शिक्षणात आघाडी घेतलेली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये खासगी शिक्षणसंस्था सुद्धा अग्रेसर असून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,’’ असे मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले.

‘भारती विद्यापीठा’च्या ५९ व्या वर्धापनदिन समारंभात विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. तर अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहाचे उद्‌घाटन राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे आणि कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या ‘विचारभारती’ या मुखपत्राच्या वर्धापनदिन विशेषांकाचे आणि विश्व भारती या इंग्रजी वार्तापत्राचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. विद्यापीठासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आनंदराव पाटील यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांना ‘डॉ पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार’ने गौरविण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

गेहलोत म्हणाले, ‘‘नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राजस्थान सरकारप्रमाणे अन्य राज्यांनी आरोग्य हक्‍क कायदा लागू करावा. आगामी काळात शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन विषयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात सामाजिक सुरक्षा हक्काचाही विचार होणे गरजेचे आहे.

नार्वेकर म्हणाले, ‘‘वाचायला शिकवतो तो देश घडवतो. आज स्किल्ड कॅपिटल ही भारताची नवी ओळख आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि तरुणांचा देश बनतो आहे. सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या भारती विद्यापीठासारख्या शिक्षण संस्थांचा यात सर्वात मोठा वाटा आहे.’’

‘‘जनसामान्यांचे विद्यापीठ अशी भारती विद्यापीठाची ओळख आहे याचे कारण शिक्षणाबरोबरच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीतही या विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे’’, असे डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अस्मिता जगताप यांनी आभार मानले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com