महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय ‘शाळा’ केली जात आहे

Shivsena
Shivsena

पुणे - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय ‘शाळा’ केली जात आहे. विद्यार्थी संघटनांनी राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे, तर सरकार महाविद्यालये सुरू करण्याच्या तयारीत असताना राज्यपाल श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर कोश्‍यारी यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘‘शाळा सुरू झाल्या असताना महाविद्यालये सुरू न होणे हे विसंगत वाटत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या नियमाप्रमाणे महाविद्यालये सुरू करता येतील का, याचा विचार केला पाहिजे,’’ अशी सूचना त्यांनी दिली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; पण उच्च शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून त्यावर खुलासा करण्यास सांगितल्याने विद्यापीठाचा निर्णय वादात सापडला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालये सुरू करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. 

पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकारची भूमिका एकमेकांच्या विरोधात होती. त्यामुळे विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा मुद्दा चर्चेला आला होता. आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे राज्यपालांनी सांगितल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शाळा, मंदिर, लोकल, उद्याने यांसह सर्व काही सुरू झाले आहे; पण महाविद्यालये सुरू केली जात नाहीत. कोरोना फक्त महाविद्यालयांमधूनच पसरतो का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून त्वरित महाविद्यालये सुरू करावीत. 
- स्वप्‍नील बेगडे, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 

राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे; पण राज्यपालांची भूमिका विद्यार्थी हिताची असेल, तर ती सरकारने स्वीकारली पाहिजे. एकीकडे राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शाळा सुरू करत आहेत, तर सामंत महाविद्यालये सुरू करण्यास विरोध करत आहेत. हे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये.
- ॲड. सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट युनियन

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करून महाविद्यालये सुरू करणार आहेत. त्यासाठी तयारीही सुरू आहे; पण राज्यपाल नेमकी आताच भूमिका घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचे श्रेय घेत आहेत. ज्यावेळी विद्यार्थी भीतीच्या वातावरणात होते, तेव्हा राज्यपाल कुठे होते? 
- किरण साळी, पुणे शहर उपप्रमुख, शिवसेना

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com