पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आल्याने पर्यायाने आंतरराष्ट्रीय पर्यटनावरही निर्बंध आले. मात्र याचा फायदा देशांतर्गत पर्यटनाला (tourism) झाला आहे. परदेशात जाण्यासाठी अडथळे असल्याने नागरिकांनी या काळात देशातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यास पसंती दिली. त्यामुळे कोरोनाचे या संकटाचे (Corona crisis)देशांतर्गत पर्यटनासाठी ‘संधी’मध्ये रूपांतर झाले आहे. प्रशासनाकडून पायाभूत सुविधांचा विकास वेगाने झाला, तर देशांतर्गत पर्यटनाचे ‘अच्छे दिन’ दूर नाहीत, असा सूर ‘राष्ट्रीय पर्यटन दिना’निमित्त पर्यटन व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
परदेशातील पर्यटन स्थळे नागरिकांना कायमच आकर्षित करत असतात. परदेशवारीची ओढ यानिमित्ताने पूर्ण करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मात्र कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्यावर परदेश प्रवासावर अनेक निर्बंध आले. निवडक देशांतील नागरिकांना प्रवेश, कोरोनाच्या चाचणीचे बंधन, लससक्ती असे अनेक नियम लागू झाल्याने परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली. याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत पर्यटनावर झाला. पर्यटनोत्सुक नागरिकांनी आपला मोर्चा देशातील पर्यटन स्थळांकडे वळवला. काश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान यांसारख्या नेहमीच्या पर्यटन स्थळांवर गर्दी होऊ लागली. तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतील हटके आणि आजवर फारसे भेट न दिल्या गेलेल्या स्थळांकडेही पर्यटकांचे लक्ष गेले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणीही पर्यटकांचा ओघ वाढला. त्यामुळे सध्या ३००-४०० किमी अंतरावर असलेल्या पर्यटन स्थळांवर जाऊन आठवडाभराच्या ‘छोट्या सुट्टी’चा आनंद घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.
‘रस्ते सुधारा; पर्यटन बहरेल’
‘‘देशातील पर्यटन स्थळे पूर्वीही नागरिकांना आकर्षित करत असत. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने या स्थळांना भेट देणे टाळले जात असे. विशेषतः रस्ते, निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे देशांतर्गत पर्यटन टाळले जात असे. आता काही राज्यांमध्ये यात बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येते. पर्यटकही तेच निरीक्षण नोंदवतात. जवळपास प्रत्येक पर्यटनाचा त्यांचा अनुभव समाधानकारक असतो. मात्र महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये बऱ्याच सुधारणांची गरज आहे. विशेषतः, राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. या कारणामुळे अनेक पर्यटक प्रवास टाळतात. त्यामुळे राज्यातील रस्ते सुधारा, म्हणजे पर्यटनही बहरेल’’, असे मत केसरी टूर्सच्या झेलम चौबळ यांनी व्यक्त केले.
‘‘यापूर्वी भारतीयांना परदेशाचे प्रचंड आकर्षण होते. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने का होईना, परंतु एकदा तरी परदेशवारी करण्याची इच्छा बहुतांश नागरिकांची असायची. आता प्रवासावरच बंदी आल्याने पर्यटक साहजिकच देशांतर्गत स्थळांकडे वळले. देशात नैसर्गिक वरदान लाभलेली तसेच पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व असलेले विविध ठिकाणे आहेत. या स्थळांचे सौंदर्य यानिमित्ताने पर्यटकांनी बघितले आणि ते भारावून गेले. त्यामुळे देशातील इतरही पर्यटन स्थळांची सफर करण्याची मानस ते व्यक्त करतात. ही देशांतर्गत पर्यटनासाठी अतिशय उत्साहवर्धक बाब आहे. महसूल निर्मितीला यामुळे हातभार लागत असून स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे.’’
- कॅ. निलेश गायकवाड, ‘कॅ. निलेश ट्रॅव्हल्स’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.