![Pune Weekend Lockdown](http://media.assettype.com/esakal%2F2021-04%2Fa4c5f0e5-daaa-4a4b-b8ad-b530c9e04991%2FPune_Lockdown.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुण्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३६ हजारांवर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती आणि मेच्या पहिल्या आठवड्यात ती संख्या पंचवीस हजारांवर आहे.
पुणे - राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात सांगितलं, की ‘पुण्यात लॉकडाउन लावला पाहिजे.’ आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार म्हणतात, ‘पुण्यातले निर्बंध कडक केले पाहिजेत.’ पुण्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३६ हजारांवर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती आणि मेच्या पहिल्या आठवड्यात ती संख्या पंचवीस हजारांवर आहे. परिस्थिती गंभीर आहेच; तथापि त्यावर लॉकडाउन, कडक निर्बंध एवढा एकच पर्याय आहे, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे, असं स्पष्ट दिसतं.
कोरोनाच्या संसर्गात पुणे देशाचा केंद्रबिंदू ठरलं. सात हजारांवर नागरिकांचा कोरोनानं मृत्यू झाला. आजघडीला साडे सहा हजारांवर रूग्ण ऑक्सिजनवर आणि व्हेंटिलेटरवर ८०३ नागरिक कोरोनाशी झुंज देत आहेत. या परिस्थितीत आणखी ‘कडक निर्बंधा’चा धाक दाखविण्यापूर्वी राज्य सरकारनं पुण्यासाठी काय केलं, हेही सांगितलं पाहिजे. पुण्यातल्या ओस पडलेल्या रस्त्यांवर आणखी निर्बंध म्हणजे घराबाहेर डोकावलं तरी सरकार हात-पाय बांधणार आहे का, असा प्रश्न पडतो आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मागणीच्या चाळीस टक्के कोटा पुण्याला मिळत राहिला. लसीकरणाची रोजची क्षमता सव्वा लाखांची असताना शेकड्यातही लसीकरण अवघड बनले. खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा कोरोना उपचारासाठी राखीव असताना ससूनसारख्या सुसज्ज रुग्णालयात साठ टक्केपेक्षा कमी खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या. इतर जिल्ह्यातील रुग्ण पुण्यात उपचारासाठी येत असताना त्यादृष्टीने सुविधा वाढविणे गरजेचे होते. व्हेंटिलेटर दुरुस्तीअभावी पडून राहिले. खासगी हॉस्पिटलना सरकारी दराने ऑक्सिजन मिळणे निव्वळ दुरापास्त झाले. पहिल्या लाटेत सीओईपी जम्बो कोव्हिड केअर सेंटर चालवले आणि दुसऱ्या लाटेत ती जबाबदारी महापालिकेकडे सोपवली गेली. पुण्यात नागरीकांनी घराचे दरवाजे लावून घेतले. छोटे दुकानदार, व्यापारी, फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवले. पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड१९ रिस्पॉन्स (पीपीसीआर) या उद्योजकांच्या गटानं सिंगापूरहून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर आणले.
...तरीही कोरोनाच्या भीषण परिस्थितीला फक्त नागरिकच जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर निर्बंध लादले पाहिजेत म्हणजे साथ आटोक्यात येईल, हा भ्रम किमान तिसऱ्या लाटेपूर्वी दूर व्हायला हवा. राज्य सरकार, स्थानिक स्वराज संस्था आणि प्रशासन यांच्यातल्या समन्वयावर नागरिकांनी निर्धास्त राहावे की या सर्वांनी मिळून नागरीकांना आणखी घाबरवावे, याचा आता विचार झाला पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.