लग्न व दशक्रियाविधीत होणारी गर्दी चिंता वाढविणारी, प्रशासनाने कठोर कारवाई करावी : वळसे पाटील

लग्न व दशक्रियाविधीत होणारी गर्दी चिंता वाढविणारी, प्रशासनाने कठोर कारवाई करावी : वळसे पाटील

मंचर : कोरोनाची संकट संपले असे समजूनच आंबेगाव तालुक्यात लग्न, दशक्रिया विधीत लोक मोठ्या संख्येने हजर राहत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढून बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासनाकडून याबाबत जनजागृती केली जात आहे. पण नागरिक दुर्लक्ष करतात. ही बाब चिंताजनक आहे. जर कोरोना विषाणूचा प्रसार वाढला तर आटोक्यात आणणे कठीण होईल. त्यासाठी तातडीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी व शिस्त निर्माण होण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे आदेश राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. 

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. २७) आंबेगाव तालुक्यातील कोरोना आढावा बैठक वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कार्यकारी अभियंता बी.एन बहिर, पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे, प्रदीप पवार, सहाय्यक निबंधक पांडुरंग रोकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, उपअभियंता प्रकाश शेडेकर, गट शिक्षणाधिकारी संचीता अभंग, अरविंद देसाई उपस्थित होते. 

वळसे-पाटील म्हणाले, ''मंचर उपजिल्हा रुग्णालय व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लस देण्याचे काम गतिमान पद्धतीने करावे. मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द यासह मोठ्या गावांमध्ये सर्वेक्षण करावे. बाधित रुग्णांसाठी अवसरी खुर्द येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड उपचार केंद्र सुरु करावे.'' अवसरी खुर्द येथील तंत्र निकेतन महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची नाष्टा व जेवणाची व्यवस्था पराग मिल्क फुड्स (गोवर्धन दूध प्रकल्प) यांच्यामार्फत सुरू झाली आहे. असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले. 

लग्न समारंभ होणाऱ्या मंगल कार्यालयांना पोलिसांकडे आगाऊ नोटीस दिल्या आहेत. दशक्रिया विधी, लग्न समारंभावर पोलिस खाते लक्ष ठेवणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास कार्यमालक व मंगल कार्यालय मालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून. दंडात्मक कारवाई केली जाईल. सुधारणा झाली नाही तर मंगल कार्यालय १५ दिवसांसाठी सील केले जाईल. -अनिल लंबाते, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवार (ता.१० मार्च) ते शुक्रवार (ता १२ मार्च) या कालावधीत होणारी यात्रा कोरोना विषाणूच्या  पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. -दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य  

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com