आळंदीकरांना वाटतेय भीती...शहराच्या सीमा बंद करण्याची मागणी 

Alandi
Alandi

आळंदी (पुणे) : आळंदी शहरालगतच्या मोशी, चऱ्होलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातून आळंदीत कधीही लागण होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या लॉकडाउन काळातील आळंदीलगतच्या गावातील नागरिकांना मज्जाव करून शहरात येणारे सर्व रस्ते बंद करावेत. तसेच, भाजीपाल्यासह इतर दुकाने आठवड्यात बुधवार आणि रविवार दोनच दिवस खुले करून इतर दिवशी स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पाळून बंद ठेवावा, अशी मागणी आळंदीकरांनी पोलिस आणि पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे केली.

याबाबतचे निवेदन मंगळवारी (ता. 12) आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्यासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनाही दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत लॉकडाउन जाहीर झाल्यापासून भाजी खरेदी विक्री करण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्यातच मोशी, चऱ्होलीत दररोज कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. मोशी, चऱ्होली, धानोरे, केळगाव, वडमुखवाडी, डुडुळगाव या भागातील नागरिक आळंदीत मोठ्या संख्येने दररोज येतात. परिणामी कोरोनाची आळंदीकरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

याबाबत आळंदीतील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली की, शहराच्या सीमा बंद करून बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करावी. शहरातील नागरिकांची थर्मल टेस्ट करावी. संचारबंदीनंतर किराणा दुकानदारांनी अचानक भाववाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने दरपत्रक लावावे. भाजीपाल्यासह इतर दुकाने बुधवारी आणि रविवारी दोनच दिवस खुली असावीत. दुकानांसाठी सकाळी सात ते दुपारी एक, अशी वेळ निश्‍चित करावी. सरकारतर्फे व काही स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू असलेले अन्नछत्र त्वरित बंद करून एकाच ठिकाणी वंचितांच्या अन्नाची सोय करावी. बाहेरून येणाऱ्या लग्नासारख्या कार्ये बंद असावीत. परगावी जाणाऱ्या मजूर व कामगारांची सध्या चावडी चौकातील तलाठी कार्यालयात नोंदणीमुळे गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोंदणीची चाकण चौकातील शाळेच्या आवारात पर्यायी व्यवस्था करावी. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले, ""ग्रामस्थांच्या निवेदनाची माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी दिले. त्यांनी आदेश दिल्यावरच कार्यवाही करता येईल. स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नाही.'' नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर म्हणाल्या, ""पोलिस अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर आळंदीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळप्रसंगी ग्रामस्थांची मदत घेऊन कार्यवाही करावी. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. गावच्या सीमा बंद करणे सर्वांत गरजेचे आहे.'' 

दरम्यान, आळंदीत लहान मुलांच्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वाढ होत चालली असून, तेथे अनेक गैरप्रकार होत आहे. परिणामी आळंदीकरांची बदनामी होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थांची नोंदणी बंधनकारक करून संस्था चालविताना ग्रामस्थांची परवानगी आवश्‍यक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com