अरे बाप रे! अद्यापही 68 हजार मजूर अडकले पुण्यातच; डाेळे लागले परतीकडे

worker
worker

पुणे : बांधकाम, हॉटेल, सुरक्षा क्षेत्राबरोबरच उद्योगांमधील कंत्राटी आणि कायमस्वरूपीही सुमारे 68 हजार मजूर, कामगार परतीच्या प्रतीक्षेत आहेत. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील मजूर, कामगारांचा यामध्ये समावेश आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधील मजूर- कामगारांना त्यांच्या-त्यांच्या राज्यांतील गावी परतायचे आहे. केंद्र सरकराने मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ही रेल्वेगाडी सुरू केली आणि प्रवासाचा 85 टक्के खर्च रेल्वे आणि 15 टक्के खर्च राज्य सरकार करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे मजुरांच्या परतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

इमारती, तसेच रस्ते, पूल आदींच्या बांधकाम क्षेत्रात प्रामुख्याने झारखंड, छत्तीसहगड, मध्य प्रदेशातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात शहरात आहे. हॉटेलमध्ये वेटर, कॅप्टन, कूक म्हणून काम करणारा पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशातील वर्ग आहे. कंत्राटी कामगारांत उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील कामगारांचा समावेश आहे.

तसेच पथारीवाल्यांमध्येही परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. मॉल, खासगी रुग्णालये, दुकाने आदींमध्येही ते काम करतात. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य सरकारने परप्रांतीय कामगार, मजुरांची नोंदणी सुरू केल्यावर पुण्यात शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून परतण्यासाठी गेल्या आठवड्यात 1 लाख 08 हजार मजुरांनी नोंदणी केली आहे. त्यांच्यापैकी सुमारे 40 हजार मजूर गेल्या सहा दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी रवाना झाले आहेत. उर्वरित 68 हजार मजुरांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

एका रेल्वेगाडीसाठी सुमारे 1200 मजुर हवे असतात. नोंदणी केलेल्या कामगारांना कोणत्या राज्यात, शहरात जायचे आहे आणि रेल्वे गाडीचा मार्ग, या नुसार नियोजन करण्यात येत आहे. रेल्वेच्या एका फेरीत जास्तीत मजुरांना त्यांच्या गावी कसे जाता येईल, त्यासाठी गरज पडली तर रेल्वेच्या मार्गातही बदल केला जातो, असे जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. गावी परतण्यासाठी नोंदणी केलेल्या मजुर-कामगारांमध्ये त्यांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहणारे मजूरही गावी निघाले असून, तात्पुरते स्थलांतरीतही परतत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे हे कामगार प्रामुख्याने गावी परतत असल्याचे निरीक्षण प्रशासकीय अधिकाऱयांनी वर्तविले.
बाप रे ! पुण्याने ओलांडला कोरोनाग्रस्तांचा तीन हजारांचा टप्पा

मजूर थांबू लागले-
शहरातील उद्योग, बांधकामे, खासगी कंपन्या, दुकाने काही प्रमाणात सुरू होऊ लागली आहेत. त्यासाठी मनुष्यबळही लागत आहे. ते उपलब्ध होत आहे. त्यातून मजूर, कामगारांना पैसेही मिळू लागले आहेत. त्यामुळे गावी परतण्याचा निर्णय रद्द करून मजूर येथे राहू लागले आहेत, असा अनुभव बांधकाम व्यावसायिक अखिल अग्रवाल यांनी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com