आंबेगाव : 28 वर्षांपासून वाळूंजवाडी गावच बेपत्ता; गावाचा निधी वाळूंजनगरला

आंबेगाव : 28 वर्षांपासून वाळूंजवाडी गावच बेपत्ता; गावाचा निधी वाळूंजनगरला

मंचर  : आंबेगाव तालुक्यातील मंचरच्या जवळ असलेले वाळूंजवाडी महसुली गाव आहे. हे गाव प्रशासनाच्या संकेतस्थळावर दिसत आहे. पण तब्बल 28 वर्षांपासून ग्रामपंचायत नसल्याने गाव बेपत्ता आहे. या गावाचा निधी मात्र नावात साधर्म्य असलेल्या पण अजूनही महसुली दर्जा नसलेल्या वाळूंजनगर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे वाळूंजवाडी गावाचा सेन्सेक्स व लोकसंख्येचा वापर करून वाळूंजनगर ग्रामपंचायतीला निधी वर्ग केला जात आहे. ही बाब आत्तापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आली नाही, असा संतप्त सवाल वाळूंजवाडी येथील गावकऱ्यांनी मंचर येथे रविवारी (ता. 10) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

2011 च्या जनगणनेनुसार वडगाव काशिंबेग गावची दोन हजार 617 व वाळूंजवाडीची एक हजार २६ लोकसंख्या आहे. (त्यामध्ये ठाकर समाजाच्या 350 लोकसंख्येचा समावेश आहे.) एकूण लोकसंख्या तीन हजार 643 आहे. वडगाव काशिंबेग ग्रामपंचायतीत आत्तापर्यंत वाळूंजवाडीचा समावेश होता. 14व्या वित्त आयोगातून दोन हजार ६१७ लोकसंख्येनुसार अनुदान मिळत आहे. उर्वरित वाळूंजवाडीचे लोकसंख्येचे अनुदान का मिळत नाही. म्हणून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला. त्यावेळी गावकऱ्यांना धक्काच बसला. वाळूंजवाडीचे 28 वर्षांपूर्वीची महसुली गाव अस्तित्वात आल्याची नोंद आहे. गावचा सेन्सेक्स  क्रमांक 555518 आहे. त्यानुसार चौकशीची चक्र फिरली. सदर सेन्सेक्स क्रमांकचा वापर वाळूंजनगर ग्रामपंचायतीसाठी केला जात आहे. विशेष म्हणजे वाळूंजनगरमध्ये एकही ठाकर कुटुंब राहत नाही. पण ठाकर कुटुंबांचा निधी मात्र वाळूंजनगरला हस्तांतरित होत आहे, अशी माहिती ग्रामस्थ नवनाथ चिंतामण वाळूंज यांनी दिली.

दरम्यान (ता.१७ फेब्रुवारी २०२० रोजी) वडगाव काशिंबेग गावापासून विभक्त होऊन वाळूंजवाडी ग्रामपंचायत मंजूर झाली. वाळूंजवाडीचा 28 वर्षापासून सेन्सेक्स क्रमांक 555518 अस्तित्वात आजतागायत आहे.आत्ता नव्याने वाळूंजवाडी ग्रामपंचायतीला नवीन सेन्सेक्स क्रमांक मिळणार कि जुनाच राहणार याबाबत गावकरी अजूनही संभ्रमात आहे. वाळूंजनगर ग्रामपंचायतीला निधी वर्ग केला याबाबत आमची तक्रार नाही. पण अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामावर आक्षेप आहे. असे वाळूंजवाडीचे ग्रामस्थ सरपंच रुख्मिणी पुनाजी खंडागळे, सोनाली सुनील वाळूंज, माजी उपसरपंच बाळासाहेब एकनाथ लोंढे, सागर कोंडीभाऊ वाळूंज यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या  वाळूंजवाडीला महसुली गाव म्हणून 28 वर्षांपूर्वी दर्जा मिळाला आहे. दरम्यान त्याच काळात लोणी गावाच्या पूर्वेला असलेल्या वाळूंजनगर व रानमळा या दोन्ही ग्रामपंचायतीची स्थापना झाली. 2011 च्या जनगणनेमध्ये ग्रामपंचायत वाळूंजनगरची स्वतंत्र जनगणना झाल्याचे निदर्शनास येत नाही. वाळूंजवाडीची लोकसंख्या एक हजार 26 आहे. या लोकसंख्येचे अनुदान  वाळूंजनगरला वर्ग झाल्याची शक्यता असल्याचे पत्र आंबेगाव तालुका पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी दिले आहे. रानमळा व वाळूंजनगर या दोन्ही ग्रामपंचायतीची एकत्रित लोकसंख्या एक हजार 92 आहे. परंतू सर्व निधी रानमळ्याला जात आहे. तर वाळूंजवाडीचा निधी वाळूंजनगरला जात आहे. -राजाराम बाणखेले, सदस्य आंबेगाव तालुका पंचायत समिती मंचर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com