अजित पवारांचे दुखणे मला माहितीय; योग्य वेळी बोलेनः फडणवीस

अजित पवारांचे दुखणे मला माहितीय; योग्य वेळी बोलेनः फडणवीस

पुणे : ''आम्ही कोणाच्या बोलण्याने महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. पण शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे,'' असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेवर शरसंधान साधले. लव्ह जिहाद'च्या मुद्यावर शिवसेना आग्रही होती. मात्र, त्यांच्या भूमिकेत आता बदला झाला आहे, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील भाजप-मित्रपक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ फडणवीस पुण्यात आले होते. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजकीय परिस्थिती, त्याचे परिणाम, राज्य सरकारचे धोरणे आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आपली भूमिका मांडली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. 

अभिनेत्री कंगना राणावत, पत्रकार अर्णव गोस्वामीबाबतची भाजपची भूमिका महाराष्ट्रद्रोही असल्याच्या आरोपाचे फडणवीस यांनी खंडन केले. तसेच शिवसेनेच्या धोरणांवरच बोट ठेवले. 

फडणवीस म्हणाले,  "राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. विजबिलाबाबतही सरकारने घूमजाव केले असून, अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई नाही. पंचनामेही अर्धवट केले आहेत. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेतले नाही. कोरोनाकाळात भ्रष्टाचार होत आहे. त्यावर विरोधक म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत.''

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीचा केल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आरोप फडणवीस यांनी खोडून काढले. "बोगस मतदान नोंदल्याचा आरोप म्हणजे, जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. या निवडणुकीत "ईव्हीएम' नसल्याने तो आरोप करता येणार नाही म्हणून पाटील आता "कव्हर फायरिंग' करीत आहेत. पाटील यांचा हा आरोप म्हणजे मतदारांवरील अविश्‍वास आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुखणे काय आहे ? हे मला माहीत त्यावर योग्यवेळी बोलेन, असे सांगत फडणवीस यांनी पवार यांच्यावर निशाना साधला. भाजपाकडे 105 आमदार असूनही सत्ता येत नाही. त्यामुळे ते कंड्या पेटवत असल्याची टीका अजित पवार यांनी भाजपवर केली होती. राजकारणात टीका-टिप्पणी होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आरोपाबाबत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आमच्या दृष्टीने तो संपला आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहे. हे अनैसर्गिक सरकार असून, ते जेव्हा कोसळेल, तेव्हा आम्ही योग्य पर्याय देऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकार पडण्याकडे आम्ही कोणीच डोळे लावलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. ती जबाबदारी आम्ही पार पाडू. सरकारविरोधात बोलत राहू, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com