आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 

Alandi.
Alandi.

आळंदी (पुणे) : आळंदी येथे पुणे- आळंदी रस्त्यावर पालिकेच्या नऊ गुंठे जागेत ब्रिटीशकालीन पाणीपुरवठा टाकी असून, त्यावर खासगी मालकांनी अतिक्रमण करून अनाधिकृत शेड बांधकाम करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात इतरत्रही रस्त्याकडेच्या पालिकेच्या जागा बळकावल्या जात आहेत. याला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरेने पालिकेच्या मालकीच्या जागांना तार कंपाउंड करून जागा सुरक्षित करण्याचे निवेदन आळंदी विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी पालिकेला दिले. 

या निवेदनात कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, पुणे- आळंदी रस्त्यावर आळंदी पालिकेची नऊ गुंठे जागा आहे. त्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी ब्रिटीशकालीन दगडी पाण्याची टाकी आहे. सध्या या टाकीभोवताली अतिक्रमण झाले असून, टाकीही जमिनदोस्त करण्याचा डाव काही राजकिय मंडळी करत आहे. टाकीच्या अवतीभवती अनाधिकृत आणि बेकायदा बांधकाम सुरू आहे. त्यामुळे टाकीभोवतालचे अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी आळंदी विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

आळंदीत सध्या जागेचे भाव गुंठ्याला दहा ते पंधरा लाखाहून अधिक आहेत. अशावेळी मोकळी जागा दिसली की अतिक्रमण केले जात आहे. अनेक ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या जागेवर शेड मारले आहेत. तसेच, हॉटेल व खानावळ टाकली आहे. तर, म्हशींसाठी गोठा बांधला आहे. अनेकांनी घरेही बांधली आहेत. गणपतीचे मंदिरही उभारले आहे. पुणे- आळंदी रस्त्याबरोबरच प्रदक्षिणा रस्ता, गार्डनलगत, चाकण चौक, गोपाळपुरा, इंद्रायणीनगर, रिंगरोड अशा विविध ठिकाणी लॉकडाउनच्या काळात बेकायदा आणि अनाधिकृत बांधकामे झाली. पार्किंगमध्येही अशाच पद्धतीने बेकायदा दुकाने लागली आहेत. शहरात इतर ठिकाणीही रस्त्याकडेचे व अंतर्गत रस्त्याला लागून असलेल्या अनेक मोक्याच्या जागा हेरून राजकिय तसेच तथाकथित कार्यकर्त्यांनी वैयक्तिक वापरासाठी अतिक्रमण केले आहे. 

वास्तविक पालिकेचा बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाची पालिकेच्या मालमत्तेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून जबाबदारी अधिक आहे. रस्ते विकासासाठी लाख मोलाच्या जागा पालिकेने अधिगृहित केल्या. मात्र, स्वतःच्या जागा काही राजकिय मंडळींनी अतिक्रमण करूनही ताब्यात घेतल्या जात नाही. तसेच, कारवाईही केली जात नाही. सातबारा व सीटी सर्वे रेकॉर्डला अनेक जागांवर पालिकेची मालकी आहे. मात्र, सध्या या जागांवर अतिक्रमण करण्याचा सपाटाच सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने बांधकाम विभागप्रमुख आणि अतिक्रमण विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपवून पालिकेच्या जागांवरील अतिक्रमण हटवून पालिकेच्या जागा संरक्षित कराव्यात, अशी मागणी आळंदी विकास मंचच्या वतीने पालिका प्रशासनाला केली आहे. या मागणीचे निवेदन संदिप नाईकरे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, योगिराज सातपुते, रामदास दाभाडे, अमित घुंडरे, रूपाली पानसरे, किरण नरके, नितीन चौधरी, किशोर घुंडरे यांनी दिले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com