अस्मानीच्या संकटानंतर बळीराजाला बसला सुलतानीचा फटका 

farming.jpg
farming.jpg

शेटफळगढे (पुणे) : भिगवण मंडलातील शेटफळगढे येथे १०६ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, मंडलाचे गाव असलेल्या भिगवण येथे ४५ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे सरकारच्या नियमानुसार शेटफळगढे येथील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. मात्र, आता दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेटफळगढे परिसरात ६ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या बाजरीचे, शेतात उभ्या असलेल्या ऊस, मका व कडवळ या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या नुकसान झालेल्या शेती पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. अखेरीस इंदापूर तहसील कार्यालयाने याबाबतचा नऊ सप्टेंबरला आदेश काढला आहे. त्यानुसार तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने व वादळी वाऱ्यामुळे 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांतील 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांना दिले आहेत. त्यासाठी सरकारच्या पर्जन्यमापकावरील पावसाच्या नोंदीचा आधार घेऊन पंचनामे होणार आहेत. 

दरम्यान, शेटफळगढे येथील जलसंपदा विभागाच्या पर्जन्यमापकावर 106 मिलिमीटर पावसाची 6 सप्टेंबरला नोंद झाली आहे. शेटफळगढे, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लामजेवाडी ही गावे भिगवण मंडल कार्यालयाच्या अंकित येतात. या मंडलाच्या भिगवण येथील पर्जन्यमापकावर 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला या पर्जन्यमापकावरील पावसाच्या नोंदीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. शेटफळगढे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाच्या जलसंपदा विभागाची पर्जन्यमानाची आकडेवारीही मान्य करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

केवळ मंडलनिहाय पर्जन्यमापकावरील पावसाच्या नोंदी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गृहीत धरू नयेत. कारण, या परिसरातील गावे भिगवणपासून जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर लांब आहेत. सर्वत्र पाऊस कधीच सारखा पडत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागही सरकारचाच आहे. त्यामुळे 6 सप्टेंबरला जलसंपदा विभागाच्या शेटफळगढे येथील पर्जन्यमापकावर 106 मिलिमीटर झालेल्या पावसाची नोंद ग्राह्य धरावी. या परिसरातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. 
- माउली भोसले, शेतकरी, शेटफळगढे (ता. इंदापूर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com