
शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील गावांसाठी चासकमान कालव्याच्या कोरेगाव- धानोरे शाखेच्या उर्वरित दोन चाऱ्यांना पाणी आज सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
चासकमान कालव्याच्या पाण्यासाठी शिक्रापूर परिसरातील दहा गावांतील शेतकऱ्यांनी 5 मे रोजी चक्री उपोषण सुरू केले होते. दरम्यान या भागातील 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर शिवसेना व भाजपने आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आज सकाळी दहाच्या सुमारास कोरेगाव- धानोरे शाखेच्या उर्वरित दोन्ही चाऱ्यांना पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्याची माहिती कळताच आंदोलक शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, पाणी सोडणार म्हणून आंदोलनाला दूर पाहणारे काही जण चारीजवळ आल्याने शेतकऱ्यांच्या वतीने या सर्वांचा तीव्र भाषेत निषेध शेतकऱ्यांनी घेतला. तसेच, या पुढे अशा चोमडेपणा केलेल्या काही पुढाऱ्यांच्या एजंटांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशाराही आंदोलकांच्या वतीने समाधान डोके यांनी या वेळी दिला.
पाटबंधारे खात्याचा गैरकारभार, दोन- दोन पत्रे देवून पाणी न देण्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व पाणी वितरणाची कुठलीच समन्यायी पद्धत वापरत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल 60 दिवस पाणी मिळाले नाही. त्यामुळे या भागातील 10 गावांमधील शेकडो एकर जमिनीतील पिकांच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे व न्यायालयाकडे शेतकऱ्यांच्या वतीने आपण धाव घेतली आहे, असे ऍड. दिग्विजय पलांडे यांनी सांगितले.
दरम्यान, आज सोडलेले आवर्तन पुढील आठ ते नऊ दिवसांकरिता आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार ते पूर्वनियोजित आहे. ते पाटबंधारे विभागाच्या मजुरांनी सोडले आहे, असे शाखा अभियंता एस. व्ही. गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.