निरगुडसर : भागडी (ता.आंबेगाव) येथील गवारी-आदक मळ्यात वनविभागाने शनिवारी (ता.१५) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.तीन बिबट्या पैकी एक अडकल्याने भागडी ग्रामस्थांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.
भागडी गावाच्या पश्चिम दिशेला गवारी-आदक मळा असून तेथे संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी राहतात,गेली दीड महिन्यांपासून या वस्तीत बिबट्यांचा वावर आहे,अनेक वेळा शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झालेले आहे,शनिवारी (ता.१५ ) रोजी सकाळी संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना एकाच वेळी तीन बिबटे दिसून आले.
आदक यांनी सरपंच गोपाळ गवारी यांना घटनेची माहिती दिलीसरपंच गोपाळ गवारी यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली,त्यानुसार शनिवारी सायंकाळी वनविभागाने गवारी- आदक मळा येथे पिंजरा लावल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
गवारी - आदक मळ्यात अजूनही तेथे दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत,त्यांचा ही वनविभागाने बंदोबस्त करावा . अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे.पिंजऱ्यात जेर बंद झालेला बिबट्या ही मादी असून पाच वर्ष वयाची आहे पकडली मादी अवसरी घाटात नेण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.