भारताला जागतिक दर्जाचा अन्नप्रक्रिया ब्रँड बनविणार

भारताला जागतिक दर्जाचा अन्नप्रक्रिया ब्रँड बनविणार
Published on

भारताला जागतिक दर्जाचा
अन्नप्रक्रिया ब्रँड बनवणार
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. १८ : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ, अन्नप्रक्रिया उद्योगांना गुंतवणुकीच्या संधी आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगाराचे बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनांच्या माध्यमातून शेती उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देत भारताला जागतिक दर्जाचा अन्नप्रक्रिया ब्रँड बनविण्याचा संकल्प केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांनी गुरुवारी व्यक्त केला.
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘सेवा दिवस’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘आशीर्वाद का दिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री पासवान यांनी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, महिला बचत गट आणि सूक्ष्म उद्योजकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रातील प्रगतीची आकडेवारीही मांडली. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ३१ हजार ५७१ वैयक्तिक, ५२२ गट आणि ७५ सामाईक पायाभूत सुविधा प्रकल्पांसह एकूण ३२ हजार १६८ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांची एकत्रित किंमत सुमारे १३ हजार १७९ कोटी रुपये आहे. राज्यातील ४८ हजार १९५ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ६१ हजार ३२३ महिला बचत गट सदस्यांना २२१.५५ कोटी रुपयांचे बीजभांडवल वितरित करण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com