

संरक्षण निर्यात ५० हजार कोटी रुपयांवर
राजनाथसिंह : गोव्यात हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
बांदा (जि. सिंधुदुर्ग), ता. २६ : भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. देशाची संरक्षण निर्यात ६०० कोटींवरून तब्बल ५० हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या सामर्थ्याचे उदाहरण असून, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारतीय लष्कर सजग, सक्षम आणि शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे,’’ असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी (गोवा) येथे आज व्यक्त केला.
गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करत पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे आदी उपस्थित होते. राजनाथसिंह म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. त्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी बलिदान दिले आहे. गोवा मुक्तिसंग्रामातील प्रत्येक सत्याग्रही आणि हुतात्म्याच्या त्यागामुळे आजचा मुक्त भारत उभा आहे. त्यामुळे पत्रादेवी ही केवळ स्मारकाची भूमी नसून, संपूर्ण देशासाठी तीर्थक्षेत्र आहे.’’
ते म्हणाले, ‘‘देशाला डिवचणाऱ्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची क्षमता भारताने दाखवून दिली आहे. आज भारत जागतिक व्यासपीठावर बोलतो, तेव्हा जग भारताचे म्हणणे गांभीर्याने ऐकते. सीमा केवळ भौगोलिक नसतात; त्या देशाच्या संकल्पशक्तीनेही निश्चित होतात.’’
गोवा मुक्तिसंग्रामाचा गौरवपूर्ण इतिहास सांगताना संरक्षणमंत्री म्हणाले, ‘‘गोव्याचा इतिहास हा भारताच्या इतिहासाशी अविभाज्यपणे जोडलेला आहे. गोव्याच्या या भूमीवर येणे माझ्यासाठी सार्थक झाले, कारण ही वीरांची भूमी आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या इतिहासाचा अंतिम अध्याय गोव्याने आपल्या रक्ताने लिहिला आहे. गोवा अनेक शतके पारतंत्र्यात होता. गोवा मुक्तीसाठी सहोदरा देवी, कर्नल बेनिपाल सिंह यांच्यासह अनेक वीरांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ही केवळ महाराष्ट्र-गोवा सीमेवरील भूमी नाही. या भूमीत संपूर्ण भारताचे दर्शन घडते.