सरकार नागरिकांना धान्य देत आहे की कचरा?; नागरी कृती समितीचा संतप्त सवाल

aa.jpg
aa.jpg

विश्रांतवाडी : "सरकार नागरिकांना धान्य देत आहे की कचरा? " असा संतप्त सवाल येरवड्यातील नागरिकांच्या वतीने येरवडा नागरी कृती समितीने उपस्थित केला आहे. येरवडा परिमंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या येरवडा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून खराब किडके गहू मिळत असून ते खाण्याजोगे देखील नाहीत. वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नाही, याचा जाब विचारण्यासाठी येरवडा नागरिक कृती समितीच्या वतीने परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ यांना लेखी निवेदन देण्यात आले.

समितीचे रुपेश घोलप,  शैलेश राजगुरु,धनंजय बाराथे, सुहास कांबळे उपस्थित होते. तसेच लॉकडाउन काळात गोरगरीब कष्टकरी वर्गाचे अतोनात हाल होत असून त्यांना किमान शासकीय धान्य तरी खाण्यालायक व योग्यवेळी मिळावे अशी रास्त अपेक्षा येरवडा नागरी समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहेत. कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक गरीब कष्टकरी, असंघटित कामगार, घर कामगार महिला,  विधवा,अपंग यांना शासकीय धान्याची खुप गरज आहे. सरकार कडून मोठ्या मोठ्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही करताना प्रशासकीय यंत्रणा, तसेच अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. सरकारमान्य धान्य दुकानदारांकडून वेळेत धान्याचा पुरवठा केला जात नाही, मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे, तसेच भरमसाठ कचरा असणारे आहे. जे जनावरांनादेखील खाता येणार नाही. दुकानदार नागरिकांना योग्य ती माहिती देत नाहीत. धान्य देण्यास टाळाटाळ करतात. अशा असंख्य तक्रारी येरवडा नागरी कृती समितीच्यावतीने लेखी निवेदनात देण्यात आले आहेत. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिमंडळ अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. 

यासंदर्भात बोलताना परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, येरवडा नागरी कृती समितीच्या वतीने आलेल्या तक्रारी बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. शासकीय गोडाऊनमधून येणाऱ्या अधिकृत धान्याचेच वितरण शासन मान्य दुकानातून केले जाते. यापुढील काळात नागरिकांना सुरळीत धान्याचा पुरवठा करण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाईल. नागरिकांना या संदर्भात कोणताही अडचणी आल्यास त्यांनी येरवडा परिमंडळ कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

(Edited by : sagar diliprao shelar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com