पुणे - महापालिकेकडून अशुद्ध पाणी पुरविले जात असल्याने गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजार होत आहे. असे असताना या आजारावरील रुग्णांना केली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याची घाई आरोग्य विभागाला झाली आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्याने आर्थिक मदत बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास एक मार्चपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
सिंहगड रस्ता परिसरात नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, नऱ्हे परिसरात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळून आले. यामध्ये रुग्णांना अर्धांगवायूचा झटका येत येतो, तसेच हा रुग्ण अनेक महिने अंथरुणाला खिळून पडतो, त्यावरील उपचारासाठी नातेवाइकांना १० लाखापर्यंत खर्च जात आहे.
महापालिकेने केलेल्या तपासणीमध्ये दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे समोर आले. ज्या भागात हे रुग्ण आढळत आहेत, तेथे महापालिकेतर्फे शुद्ध केलेले पाणी पुरविले जात नाही. धरणातील पाणी थेट नागरिकांना दिले जात होते. या पाण्यामध्ये जीबीएस होण्यासाठी कारणीभूत ठरणारा ‘इ कोलाय’ हा जिवाणू आढळल्याने खळबळ उडाली. त्यानंतर महापालिकेने अनेक सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
पण जीबीएसच्या रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत असल्याने अनेकांनी महापालिकेने मदत करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने शहरी गरीब योजनेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णास २ लाख तर अन्य रुग्णांना १ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या महिन्याभरात जीबीएसवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विहिरीतील पाण्यात क्लोरिन टाकण्यास सुरुवात केली. आर ओ प्रकल्पांना कायद्याचे पालन बंधनकारक केले. टँकर भरणा केंद्राच्या ठिकाणीही कडक नियम केल्याने सध्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाने जीबीएस रुग्णांना उपचारासाठीची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर केला आहे. तो मंजूर झाला तर मदत बंद केली जाईल, असे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
आत्तापर्यंत ३५ जणांना मदत
महापालिकेने आत्तापर्यंत जीबीएसच्या ३५ रुग्णांना आर्थिक मदत केली आहे. त्यासाठी ४९ लाख रुपये खर्ची पडले आहेत. शहरी गरीब योजनेतून १२ रुग्णांना २४ लाखांची मदत केली आहे. तर या योजनेचे लाभार्थी न होऊ शकणाऱ्या २५ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २५ लाखांची मदत केली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
नागरिक अजूनही सतर्क
जीबीएसचे रुग्ण कमी झालेले असले तरी धायरी, नऱ्हे, डीएसके विश्व, किरकटवाडी यासह अन्य भागातील नागरिक हा आजार होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. घरात रोज उकळलेले पाणी पिणे, बाहेरचे पदार्थ, पाणी टाळणे याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे हा आजार कमी होण्यास मदत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.