`रुग्णवाहिका आली असती, तर बाबा वाचले असते’

Ambulance
Ambulance

पुणे - बाबांना हदयाचा त्रास असल्यानं आम्ही सगळीजण नेमही त्यांची काळजी घ्यायचो; अगदी रात्री-अपरात्री त्रास जाणवला तरी. आधी हॉस्पिटलमध्ये जायचो, ते बरे व्हायचे. पण गुरुवारी दोन-अडीच तास फोनाफोनी करूनही आम्हाला रुग्णवाहिका न मिळाल्याने वेळेत हॉस्पिटल गाठता आले नाही आणि बाबांना वाचवू शकलो नाही...रुग्णवाहिका आली असती, तर ते बरे होऊन घरी परतले असते...यंत्रणांच्या बेजबाबदारपणाने गुरुवारी रात्री रस्त्यावर अखेरचा श्‍वास घेतलेल्या येशूदास फ्रान्सिस यांचा मुलगा मॅक्‍सने आपल्या वडिलांच्या वाट्याला आलेली वेळ आपल्या भावनेतून उभी केली.

नाना पेठेत फुले-हार विक्रीचा व्यवसाय करणारे येशूदास यांना हदयाचा असूनही स्वतःच कर्ता आणि त्यात बेताच्या परिस्थितीमुळे त्यांनी स्वत:कडे दुर्लक्ष केले होते. मात्र, अचानक गुरुवारी रात्री त्रास वाढल्याने ते हॉस्पिटलमध्ये निघाले; पण रुग्णवाहिका न आल्याने त्यांनी रस्त्यावर अखेरच श्‍वास घेतला. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जीव गमावावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी बाधित क्षेत्रांच्या परिसरात म्हणजे मध्यवर्ती भागांतील पेठांभोवती पत्र्यांचे जाळे उभारले गेले आहे. प्रमुख रस्ते आणि चौकही बंद आहेत. 

कोरोनाची साथ असूनही काही भागांत साधी रुग्णवाहिका जाईल, इतका रस्ता मोकळा ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णावाहिकाचालकांसह नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचाच भाग म्हणून गल्लीबोळ बंद असल्याची कारणे देत रुग्णवाहिका न मिळाल्याने गुरुवारी रात्री एका व्यक्तीला रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला. यासाठी आरोग्य खात्यासह पोलिस यंत्रणेलाही जबाबदार धरले जात आहे. मात्र, या घटनेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा संबंधित यंत्रणा करीत असल्या तरी, अशा काळात किमान रुग्णांची सोय व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिका-पोलिसांचे एकमेकांकडे बोट
बाधित क्षेत्रांभोवती विशेषत: पेठांमधील रस्ते, चौक, गल्लीबोळात पत्रे उभारल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अत्यावश्‍यक सेवांमधील महापालिका, आरोग्य तसेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची अडवणूक होत आहे. मात्र, अशा प्रकारे पत्रे लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचे महापालिका सांगत आहे; तर रुग्ण वाढल्याने हा उपाय केल्याची बाजू पोलिस मांडत आहेत. परंतु, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक अत्यावश्‍यक सेवांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सवलत आहे की नाही, याचे उत्तर, ना महापालिकेकडे आहे ना पोलिसांकडे. त्यामुळे बाधित क्षेत्रांतील रहिवाशांचे हाल वाढले आहेत. 

नेमके कोणते रस्ते बंद आहेत आणि कोणते सुरू आहेत, याचा अंदाज नसल्याने रुग्णवाहिकाचालकांना फिरावे लागत आहे. तर, अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या आणि ओळखपत्र असलेल्यांना पोलिस सोडत नाहीत. त्यामुळे घराबाहेर आलेल्या नागरिकांची पत्रे उभारलेल्या रस्ते, चौकात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. 

शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांची ये-जा रोखण्यासाठी बॅरिकेड आणि किमान पाच ते सहा फूट उंचीचे पत्रे उभारलेले आहेत. 

त्यामुळे भवानी पेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ अशा पेठांसह पाटील इस्टेट, इंदिरा गांधी वसाहत, लष्कर परिसरात लोकांना ये-जा करता येत नाही. जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठीही लोकांना रस्त्यावर येणे अशक्‍य झाले आहे. अन्य आजाराच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाता येत नसल्याचे चित्र आहे.

तर महापालिका, पीएमपी, रेल्वे आणि अन्य कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहने सोडण्यास पोलिस नकार देतात. त्यावरून वादाच्या घटना घडत आहेत. सर्वच रस्ते, चौक बंद केल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे.

नागरिकांना ये-जा करण्यास किमान जागा सोडून काही ठिकाणचे बॅरिकेड काढण्याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही. काही भागांतील किमान एक रस्ता मोकळा करण्याचा आग्रह धरला आहे. 
- शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त

ज्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहेत, तेथील सीमा बंद केल्या आहेत. मात्र, अत्यावश्‍यक सेवांना मुभा आहे. रुग्णवाहिका आणि अत्यावश्‍यक वाहनांकरिता काही ठिकाणी पॉइंट आहेत.
- स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com