मनाचिये वारी : आत्म्याला विठ्ठल मानून करूया घरीच चिंतन

jalal maharaj sayyad.jpg
jalal maharaj sayyad.jpg

Wari 2020 : वारी म्हणजे देवाकडे केलेली येरझार आहे. पण, पंढरीची वारी ही संतांच्या संगतीने देवाकडे जाणारी साधना आहे. वारीत अनेक विचारांचे लोक विठ्ठलप्राप्तीच्या एकाच उद्देशाने एकत्र येतात. वारीच्या सामूहिक साधनेमुळे विचार, ज्ञान आणि भक्तिभावाचे मंथन होते. भजनाने विठ्ठलाच्या सगुण भक्तीची भावना वाढीस लागते. प्रत्येक जण वारीत पांडुरंगाच्या प्रेमापोटीच आलेला असतो. वारी हा भक्तीचा अखंड प्रवाह आहे, त्यामुळे जाताना प्रत्येक वारकरी भक्तीचा एक भाग बनतो.

वर्षभर कुटुंबात, भाऊबंदकीत, गावात दैनंदिन जीवन जगत असतो. वारीत सहभागी झाल्यानंतर जीवन जगण्याची कक्षा रुंदावते, ती विस्तीर्ण होते. वारीत जगाशी संवाद साधण्याची संधी मिळते. गावाची, राज्याची, देशाची, परदेशाची सीमा ओलांडून वारकरी, अभ्यासक वारीत सहभागी होतात. सात्त्विक भावनेने जाणाऱ्या वारीत विठ्ठलाप्रती भाव वृद्धिंगत होत जातो. त्यामुळे आषाढी वारी आली, की प्रत्येक वारकऱ्याला आपोआप पंढरीचा ध्यास लागतो. विठ्ठलाच्या आठवणीने जीव कासावीस होतो. कधी एकदा वारी येते, असे होऊन जाते. वारीपूर्वी महिनाभर मनाने वारकरी वारीच्या मार्गावर पोचलेला असतो.

शेताला सतत पाणी सोडले, तर पीक सडून जाते. मात्र, तेच पाणी आवर्तन पद्धतीने दिले, तर पीक तजेलदार येते. अगदी तसेच वारकऱ्यांचे आणि वारीचे आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देवाच्या, संतांच्या पालख्या वारीला जातात, तेव्हा वारकऱ्यांमध्ये कमालीचे चैतन्य अवतरते.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे पायी वारी रद्द करावी लागली. दरवर्षी वारीला जाणे, हे प्रत्येक वारकऱ्याचे स्वप्न असते. यंदा वारीच्या प्रत्यक्ष अनुभूतीला आपण सारे मुकणार आहोत; पण या महामारीच्या काळात देवाने दिलेल्या शरीराची काळजी न घेता त्याची वारी केली, तर ती देवाला आवडेल अशी साधना होईल, असे मला वाटत नाही. कारण त्याने दिलेल्या शरीराची काळजी घेतली, तर पुढील काळात अशा अनेक आनंदवारी करता येतील. आयुष्यातील अनेक चैतन्यवारींची अनुभूती घ्यायची असेल, तर यंदा वारकऱ्यांनी "काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल।।' या तत्त्वाचे आचरण करावे. देहालाच पंढरी समजून त्याची काळजी घ्यावी. आत्म्याला विठ्ठल मानून त्याचे चिंतन घरीच बसून करावे, हीच खरी यंदाच्या वारीची साधना ठरेल.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)

 

यंदा माउलींची पालखी येणार नाही, त्यामुळे लोणंदकरांच्या मनात रुखरुख आहे. भाविकांच्या सेवेची संधी यंदा हुकणार आहे. पायी वारी नाही, अशी स्थिती पहिल्यांदाच आहे. मात्र, नाइलाज आहे. माउली ठेवतील तसेच राहणे, एवढेच आपल्या हाती आहे.
- सुरेश जाडेकर, लोणंद, जि. सातारा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com