मनाचिये वारी : जगाच्या सुखाचे मागणे, पांडुरंगाकडे मागूया

ramgiri maharaj.jpg
ramgiri maharaj.jpg

Wari 2020 : पंढरीची वारी हे वारकऱ्यांचे जीवन आहे. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे. वारकऱ्यांना देवाशिवाय कोणी आवडत नाही, असे दाखले संतांनी अनेक अभंगांतून दिले आहेत. संतांच्या संगतीने देवाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाट पंढरीचा सावळा पांडुरंग पाहत असतो.
वाट पाहे उभा। भेटीची आवडी।।
देवाच्या भेटीची वारकऱ्यांना आस लागलेली असते. तळमळीने तो नामस्मरण करीत पंढरीची वाट चालत असतो. त्याला संसाराचे भान राहत नाही. सर्वस्व त्यागून तो वारीत सहभागी झालेला असतो. त्यामुळे तो जेव्हा पांडुरंगाच्या चरणी वारी रुजू करतो, तेव्हा समाधानी असतो. महान विठ्ठलभक्त गंगागिरी महाराजांचीही पावणेदोनशे वर्षांची वारीची परंपरा आहे. गंगागिरी महाराज स्वतःची झोपडी पेटवून देऊन मग वारीत सहभागी व्हायचे. त्याचे कारण म्हणजे वारीत चालताना त्या झोपडीचीही आठवण होऊ नये. वारीत पांडुरंगाशिवाय दुसरे काहीच आठवू नये, अशी भावना वारकऱ्यांच्या मनात असते.

परंतु, यंदा वैश्‍विक महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये कोणालाच दोष देता येत नाही. परंतु मोजक्‍या वारकऱ्यांना पायी वारी करण्याची संधी सरकारने द्यायला हवी होती, अशी भावना मनात येते. मात्र, सरकारने वारकऱ्यांच्या हितासाठीच पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पर्याय नाही. सरकारचा निर्णय वारकरी संप्रदायाने मान्य केला आहे. वारी नसल्याने वारकरी दुःखी आहेत. क्षणोक्षणी वारीची वाट पाहणाऱ्या वारकऱ्यांना घरात बसावे लागले आहे, त्यामुळे त्यांचे मन उदास आहे. एरवी आजारपणामुळे एखाद्या वारकऱ्याला पंढरीला जायला मिळाले नाही, तर तो शरीराने घरी किंवा दवाखान्यात असतो, मात्र मनाने पंढरीची वाट चालत असतो. त्याचे अंतःकरण तळमळते. आजमितीला लाखो भाविकांची अवस्था तशीच आहे. परंतु मला असे वाटते, वारकऱ्यांनी दुःखी होऊ नये. शरीराने आपण पांडुरंगाच्या पायी वारीला जाऊ शकलो नसलो, तरी मनाने वारीची अनुभूती, तसेच पांडुरंगाचे दर्शन निश्‍चित करू शकतो.

कारण परमात्मा सर्वव्यापी आहे, तो सर्वांच्या हृदयात वसलेला आहे. वारकरी संप्रदायाने मानसपूजा ही एक साधना सांगितली आहे, त्यामुळे यंदा वारकऱ्यांनी मानसवारी करून पांडुरंगाला विनंती करावी. आम्ही अन्य कोणत्या अडचणी असल्या तरी तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे, सर्व जग सुखी व्हावे. कोरोनासारख्या महामारीतून जगाची मुक्तता कर, असे मागणे आपण सारे वारकरी विठ्ठलाला मागूया. राम कृष्ण हरी....
(शब्दांकन : शंकर टेमघरे)


""माउलींची पालखी आली, की जेजुरी भक्तिरसात न्हाऊन निघते. वारकरी वेळात वेळ काढून गडावरही दर्शनाला जातात. परंतु, यंदा वारी न आल्याने भाविकांना जेजुरी सुनीसुनी वाटत आहे. कोरोनाचे संकट जाऊन पुढील वर्षी तरी पायी वारी जेजुरीत येऊ दे, असे मागणे आपण सारे माउली आणि खंडोबाकडे मागूया.''
- बाळासाहेब काळे, जेजुरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com