

जावळीला बसतेय पाणीटंचाईची झळ
तालुक्यात ४४ गावे, २५ वाड्यांत भीषण स्थिती; प्रशासनाकडून केवळ प्रस्तावांचा पाऊस
सकाळ वृत्तसेवा
कास, ता. १३ : भरपूर पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. तब्बल ४४ गावे आणि २५ वाड्या-वस्त्यांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून पाहणी, सर्व्हे, प्रस्ताव आणि मंजुरी याच पातळीवर हालचाली सुरू असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील जलस्रोत आटू लागले आहेत. कुरळोशी, मोरघर, रेंगडी, भामघर, गवडी, केंडबे, भूतेघर, सांगवी तर्फ मेढा, कारगाव, वालुथ, सावली, ओखवडी, भोगवली, केळघर, करंदोशी, रिटकवली, भिवडी, महामुलकरवाडी, बेलावडे, कावडी, आपटी आणि भालेघर या गावांसह वारणेवस्ती, धनगरपेढा, सह्याद्रीनगर, शिंदेवस्ती, माणेवस्ती, कोकरेवस्ती, आंबवडे, पिसाडी, कात्रेवाडी, खिलारमुरा आणि मांटीमुरा या वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान १२ गावे आणि १४ वाड्या टंचाईग्रस्त होत्या. मात्र, एप्रिल ते जून या कालावधीत ही संख्या झपाट्याने वाढून ३२ गावे आणि ११ वाड्यांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एकूण ४४ गावे आणि २५ वाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून नव्या विहिरी अधिग्रहणासाठी १८ प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १० प्रस्ताव योग्य ठरले आहेत. काहींना मंजुरीही मिळाली आहे. मोरघर येथील खासगी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर केला असून, संबंधित विहिरीतून पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.
दरम्यान, नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत २१ पैकी १४ कामांना मंजुरी मिळाली आहे. विहिरी खोल करणे, गाळ काढणे, आडवे बोअर मारणे, तसेच गुरुत्व नलिकांची दुरुस्ती या कामांचा त्यात समावेश आहे. मोरघर (धनगरपेढा), सावली, कुरळोशी, करंदोशी, भिवडी, रिटकवली, बेलावडे आणि महामुलकरवाडी परिसरात विहिरींमध्ये आडवे बोअर घेण्याचे काम प्रस्तावित आहे.
पाणीपुरवठ्यासाठी १२ टँकर प्रस्तावित केले आहेत. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सोमर्डी, म्हाते, वागदरे येथील विहिरींसह काही खासगी विहिरींचा ‘फिडिंग पॉइंट’ म्हणून वापर करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात उपाययोजना सुरू होण्याआधीच उन्हाळा संपेल, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
..........
चौकट
.............
कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
मे महिना अर्धा संपत आला असून, प्रस्तावित कामांना प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत जून महिना उजाडून पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणीटंचाईची झळ कमी होईल आणि प्रशासन पुढील वर्षापर्यंत निर्धास्त राहील, अशी टीका ग्रामस्थांतून होत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
.........
अधिकृत १३ गावे, १० वाड्या
मोरावळे आणि आखेगणी या गावांकडून पाणीटंचाई जाहीर करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले. आतापर्यंत १३ गावे आणि १० वाड्यांना अधिकृत टंचाईग्रस्त दर्जा दिला आहे.
.........
कोट
..........
“सह्याद्रीनगर गावात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भूजल सर्वेक्षण केले. मात्र, मंजुरी मिळेपर्यंत उन्हाळाच संपेल. सर्व गावांत तातडीने कामे सुरू होणे गरजेचे आहे.”
- समीर झोरे
ग्रामस्थ, सह्याद्रीनगर
B04954
सह्याद्रीनगर ः पाणीटंचाईमुळे टँकरभोवती पाण्यासाठी ग्रामस्थांची झालेली गर्दी.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.