पत्रकारांनी प्रवाहाच्या विरोधात पोहणे गरजेचे - अनंत बागाईतकर

सध्या देशात सुरू असलेली मुस्कटदाबी थांबविण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पत्रकारांप्रमाणेच सामाजिक संस्था, नागरिकांनाही लोकशाहीची लढाई लढावी लागणार आहे.
Anant Bagaitkar
Anant Bagaitkarsakal
Summary

सध्या देशात सुरू असलेली मुस्कटदाबी थांबविण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पत्रकारांप्रमाणेच सामाजिक संस्था, नागरिकांनाही लोकशाहीची लढाई लढावी लागणार आहे.

पुणे - देशाच्या संसदेत आता पत्रकारांना प्रवेशबंदी आहे. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाला देशभरातील पत्रकारांनी कडाडून विरोध केला. पण बंदी उठू शकली नाही. आता उत्तर प्रदेशात पत्रकारांवर पोलिसांकडून सर्रासपणे खटले दाखल केले जात आहेत. परंतु पत्रकारांनी प्रवाहाच्या विरोधात पोहणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी शुक्रवारी (ता. १२) एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

सध्या देशात सुरू असलेली मुस्कटदाबी थांबविण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पत्रकारांप्रमाणेच सामाजिक संस्था, नागरिकांनाही लोकशाहीची लढाई लढावी लागणार आहे. कारण देशाची सध्याची वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. सर्वसामान्यांना धाकात ठेवले जात आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलेल्या 'न्या. लोयांचा खुनी कोण?'या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी बागाईतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साहित्यिक संजय सोनवणी आणि पुस्तकाचे लेखक निरंजन टकले, प्रशांत कोठडिया, रवींद्र माळवदकर, तमन्ना इनामदार, नरेंद्र व्यवहारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. युवक क्रांती दल, संविधानिक राष्ट्रवाद मंच, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटर, इनक्रेडेबल समाजसेवक ग्रुप (ट्रस्ट) आणि जय हिंद लोकचळवळ या संस्थांनी संयुक्तपणे या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले होते.

बागाईतकर पुढे म्हणाले, ‘माध्यमे ही समाजाचे प्रतिबिंब मांडत असतात. असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोध पत्रकारिता आहे. न्या.लोया यांच्या खुनाची चौकशी व्हावी, हीच सत्यशोधनाची मागणी या पुस्तकाचे लेखक निरंजन टकले यांची आहे. हत्येमागे मोठी व्यक्ती असेल तर गांभीर्य वाढते. लोकशाहीत चौकशीची मागणी अवाजवी नाही. न्या. लोया हत्या प्रकरणात नक्कीच पाणी मुरत आहे. दोष समोर आणणे सत्ताधिशांना नको असते. राजसत्तेचे दबाव येतात आणि याला कोणताही पक्ष अपवाद नाही.’

पत्रकार निरंजन टकले यांनी मूळ इंग्रजीतून लिहिलेल्या ‘हू किल्ड जज्ज लोया’ या इंग्रजी पुस्तकाचा मुग्धा धनंजय यांनी मराठीतून अनुवाद केला आहे. यावेळी संजय सोनवणी यांनीही मनोगत व्यक्त केले. रवींद्र माळवदकर यांनी स्वागत केले. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. असलम बागवान यांनी आभार मानले.

... ‘तरीही पुस्तक प्रकाशित झाले’

जी बातमी छापून येऊ नये, असे कोणाला वाटत असते, तीच शोधणे हे शोधपत्रकाराचे काम आहे. सत्याला वाचा फोडणे, हे शोध पत्रकारितेचे काम आहे. अशा शोधपत्रकारितेला माध्यमात जागा असायला हवी. न्या.ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूचा माध्यमातून पाठपुरावा घेतला गेला नाही. हे पुस्तक लिहिताना मोठे प्रकाशक मागे हटत होते.आयएसबीएन नंबर मिळत नव्हता. तरीही हे पुस्तक प्रकाशित झाले, असे लेखक निरंजन टकले यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com