मृत्यू दाखल्याचे काम अन्‌ दोन महिने थांब; कसबा पेठ कार्यालयात सावळा-गोंधळ 

मृत्यू दाखल्याचे काम अन्‌ दोन महिने थांब; कसबा पेठ कार्यालयात सावळा-गोंधळ 

पुणे : आईचा मृत्यू होऊन दोन महिने झाले... अद्याप मृत्यू दाखला मिळालेला नाही....चौकशी केली, तर रजिस्टरला नोंदच आढळत नाही असे कारण सांगण्यात आले.. परिणामी अद्यापही मृत्यू दाखला मिळालेला नाही...एक नागरीक. 

अर्जंट कामासाठी मृत्यू दाखल हवा होता. हातापाया पडून देखील मिळेना... अखेर दोनशे रूपये मोजावे लागले...एका नेत्याची ओळख दाखवून देखील काम न झालेला कार्यकर्ता सांगत होता. आतापर्यंत त्यांच्या किमान चार ते पाच चकरा या कार्यालयामध्ये मारून झाल्या आहेत. नावात चुका करणे, नोंदी गहाळ होणे... वेळेत नोंदी न घालणे अशा अनेक कारणांमुळे सध्या महापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. कार्यालयात चौकशी केली, तर अपुरा कर्मचारी वर्ग असे कारण पुढे करून हात झटकण्याचे प्रकार केले जात आहेत. मात्र नोटा दाखविल्या कि हे कारण दूर होते, अन्‌ अवघ्या काही तासात दाखला लगेच हातात पडतो. पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी पक्ष याकडे लक्ष देणार आहे कि नाही, असा प्रश्‍न नागरीकांकडून उपस्थित केला जातो आहे. 

वास्तविक जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर संबंधित हॉस्पीटलकडून 15 दिवसांत क्षेत्रीय कार्यालयात नोंद येणे. तेथून जन्म-मृत्यू कार्यालयाकडे ती पाठविले जाते. त्यानंतर जास्तीत जास्त वीस दिवसात दाखल मिळणे अपेक्षित आहे. परंतू दोन महिन्यांपूर्वीचे दाखले अद्याप नागरीकांना मिळालेले नाही. दाखल्यांसाठी नागरीकांना वारंवार या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. अनेकदा या कार्यालयाच्या बाहेर नागरीकांच्या दाखला घेण्यासाठी रांगाच रांगा लागल्या असतात. 

महापालिकेतील एका माननीयांनी या कामाचे टेंडर घेतले असल्याची चर्चा आहे. त्यातून एक टोळी या कार्यालयात निर्माण झाली आहे. नागरीकांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार दाखल्याचे दर आकरले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या नातेवाईकांचे दाखल मिळविण्यात अडचणी येत आहे. तर सर्वसामान्य नागरीकांचे काय हाल होत असतील. असे एका कर्मचाऱ्याने सकाळशी संपर्क करून याकडे लक्ष वेधण्याची विनंती केली. चौकशी केल्यानंतर एका क्षेत्रीय कार्यालयाकडील दोन दिवसांच्या नोंदीच गहाळ झाल्या असल्याचेही समोर आले आहे. परिणामी नोद न झाल्यामुळे दाखले मिळून शकत नसल्याने त्याचा मनस्ताप नागरीकांना सहन करावा लागत आहे. 

जन्म-मृत्यू दाखला देण्यासाठी कसबा पेठ येथे एकच कार्यालय आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयातून आठवड्यातून दोनदा या ठिकाणी नोंदी येतात. त्यात अपुरा कर्मचारी वर्ग. त्यामुळे कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार नोंदी घालतात, त्यातून विलंब होतो. परिणामी शहराच्या सर्वच भागातून नागरीक येथे दाखल्यासाठी या कार्यालयात येतात. चकरा मारून थकल्यानंतर मग त्यातून गैरप्रकार सुरू होतात. त्याऐवजी सर्व क्षेत्रीय कार्यालयातच नोंदींची व्यवस्था केली, हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊनच्या काळात राहिलेल्या नोंदी आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे प्रलंबित दाखल्यांचे प्रमाण मोठे होते. परिणामी दाखले देण्यास वेळ लागत आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांसाठीच ऑनलाइन मृत्यू दाखला देण्याची सुविधा आहे. ती अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्यांसाठी ही सुविधा नाही. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. लवकरच ही झोन निहाय वैद्यकीय अधिकारी नेमून दाखले देण्यात येणार आहे. कार्यालयात जर दाखल्यांसाठी कोणी पैसे मागे असेल, संबंधितांविरोधात लेखी तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल. -कल्पना बळीवंत (सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका) 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com