सरपंच निवडीसाठी पळवापळवी; पारनेर, गावडेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

सरपंच निवडीसाठी पळवापळवी; पारनेर, गावडेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण
Updated on

राजगुरुनगर (पुणे) : नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सहलीवर असताना, खेड घाटाजवळील एका हॉटेलमधून 15 ते 20 जणांच्या टोळक्याने मारहाण करीत रविवारी (ता. 7) रात्री अपहरण केले. तसेच, आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडीच्या एका महिला सदस्याचे राजगुरुनगर येथून चार नवनिर्वाचित सदस्यांनीच अपहरण केले. सरपंचपदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटना घडल्या असून, खेड तालुक्यातील दोन-तीन गावांमध्ये भांडणांच्या घटना घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

निघोजमध्ये सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. एका गटाचे नऊ, तर दुसर्‍या गटाचे आठ सदस्य निवडून आले आहेत. एका गटाचे सदस्य देवदर्शनासाठी सहलीवर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोज येथील भरत लाला रसाळ, योगेश आनंदा वाव्हळ, शंकर गबाजी गुंड, दिगंबर भागाजी लाळगे, गणेश दत्तू कवाद हे सर्व नवनिर्वाचित सदस्य सहलीवर होते. त्यांच्याबरोबर शंकर कृष्णा वरखडे, सतीश पोपट साळवे, नितीन नारायण पांढरकर आणि पॅनेलप्रमुख ठकाराम बाळू लंके, शिवाजी गबाजी गुंड, सुनील किसन शेटे व इतरही काही जण सहलीवर होते. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटाजवळील सूर्यकांत खानावळ येथे ते जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी सचिन मच्छिंद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनील मच्छिंद्र वराळ, निलेश राजू घोडे, अजय संजय वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, स्वप्नील भाऊसाहेब दुनगुले, सुभाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव व इतर पंधरा ते वीस जण त्याठिकाणी आले. त्यांच्यातील सुनील वराळ व अन्य तिघांनी फिर्यादी विठ्ठल भाऊसाहेब कवाद यांना लाकडी काठीने मारहाण केली. स्वप्नील दुनगुले व सचिन वराळ यांनी तलवारीचा धाक दाखवला. तसेच, सुभाष वराळ याने त्याच्या हातात लोखंडी रॉड घेऊन उपस्थितांना शिवीगाळ व दमदाटी केली व दिगंबर लाळगे यांना उचलून पांढऱ्या रंगाच्या इनोवा गाडीत बळजबरीने घालून नेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, निलेश घोडे, अजय वराळ, धोंडीभाऊ जाधव व राहुल वराळ यांनी तलवार व लोखंडी रॉड हातात घेऊन शिवीगाळ दमदाटी करत गणेश दत्तू कवाद यांचे बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीमधून अपहरण केले. याशिवाय सतीश पोपट साळवे यांच्या हातातील मोबाईल धोंडीभाऊ जाधव याने घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले. या दहा जणांवर आणि त्यांच्या बरोबरच्या १५ ते २० जणांवर खेड पोलिस ठाण्यात अपहरणाचा, मारहाणीचा, बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले अधिक तपास करीत आहेत.  

दरम्यान, दुसऱ्या घटनेमध्ये आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील नवनिर्वाचित महिला सदस्य मंगल म्हातारबा गावडे यांचे नवनिर्वाचित सदस्य, विजय धोंडिबा गावडे, विनायक ज्ञानेश्वर गावडे, प्रमोद सुखराज गावडे व महेंद्र नानाभाऊ गावडे यांनी अपहरण केले. अशी तक्रार त्यांची मुलगी तेजल म्हातारबा गावडे हिने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.  

मंगल गावडे या गावडेवाडीतून निवडून आल्या असल्या, तरी आपल्या कुटुंबासह राजगुरुनगर येथील वाडा रोडवरील माळी मळा भागातील सोनतारा या इमारतीमध्ये राहतात. रविवारी सकाळी त्यांच्याकडे त्यांच्याच गावडेवाडीमध्ये निवडून आलेले चार सदस्य आले. ते त्यांना देवदर्शनाला जाऊ असे म्हणत होते, मात्र त्यांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर त्यांनी तुमचे पती नाशिक येथे गेलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला सोडतो, असे सांगितले. म्हणून त्या त्यांच्याबरोबर गेल्या. दरम्यान, फिर्यादी असलेल्या त्यांच्या मुलीने साडेअकरा वाजता आई तुमच्याकडे येत असल्याचे फोन करून वडिलांना सांगितले. त्यानंतर  संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वडील राजगुरुनगर येथील घरी आले. परंतु, त्यांच्यासोबत आई मंगल नव्हत्या, तसेच, त्यांचा फोनही लागत नव्हता. म्हणून त्यांची मुलगी तेजल हिने खेड पोलिस ठाण्यात वरील चौघांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com