रांजणगाव सांडस : कांदा पिकावर फवारले तणनाशक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

रांजणगाव सांडस : कांदा पिकावर फवारले तणनाशक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Updated on

पुणे : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दुकानदाराच्या चुकीमुळे फवारण्यासाठी गव्हाचे तननाशक दिल्याने पीडित शेतकऱ्याचे अंदाजे सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव यशवंत रणदिवे (वय ३५, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर) असे पीडित शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी पारगाव सा. मा. (ता. दौंड) यांच्या जय मल्हार कृषी सेवा आणि कंपनीकडून २२/१/२०२१ रोजी कांदा पिकाठी खते व औषधांची खरेदी केली होती. परंतु दुकानदार गणेश माणिक वाघोले यांनी कांदा पिकाठी  योग्य तणनाशक औषध देण्याऐवजी गव्हाचे तणनाशक दिले.

पीडित शेतकरी रणदिवे यांनी दुकानदारावर विश्वास ठेवून आपल्या ३६ गुंठे क्षेत्रातील ३८ दिवसांच्या कांदा पिकावर हे तणनाशक फवारले. त्यामुळे कांदा पीक पूर्णतः जळून गेल्याने पीडित शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसला आहे.

याप्रकरणी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पीडित शेतकऱ्यांने २३/२/२०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने ५/३/२०२१ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे. या समितीमध्ये शिरूरचे तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. भारती, बी. जी. टेमकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. पी. बुधवंत यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश होता.

तक्रार निवारण समितीने दिलेल्या अहवालानुसार, पीडित शेतकऱ्याने कांदा लागवड केल्यानंतर ३८ दिवसांनी तणनाशकाची फवारणी केलेली होती. तणनाशकाची फवारणी केल्यानंतर कांदा पिकाची पाने पिवळी पडून जागीच जळून गेली होती.

सदर कांदा लागवड एकूण ३६ गुंठ्यामध्ये असून पूर्ण क्षेत्रातील कांदा रोपे जळून गेलेली होती. कांद्याची गाठ सडलेली आढळून आली. तसेच कांदा पिकावर ट्रॉपिकल ऍग्रोसिस्टम कंपनीचे मेटसल्फरॉन मिथिल २०% डब्ल्यूपी उत्पादित 'टॅगरीप' व निशीनो इंडिया कंपनीचे क्लोडीनॅफोप प्रोपारजील १५% डब्ल्यूपी उत्पादित 'बिजिली' या तणनाशकांचा फवारणीमुळे १००% नुकसान झाल्याचा स्पष्ट अहवाल तक्रार निवारण समितीने सादर केला आहे.

दरम्यान जय मल्हार कृषी सेवा आणि कंपनीचे मालक गणेश वाघोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, हे औषध मी गहू या पिकासाठी तननाशक म्हणून दिले होते परंतु शेतकऱ्याने कांदा या पिकावर ते फवारल्याने हे त्यांचे नुकसान झाले आहे.

आता तरी शेतकऱ्याला न्याय मिळेल का? : चुकीचे औषध विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्या जय मल्हार कृषी सेवा आणि कंपनीचे मालक गणेश वाघोले याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित शेतकऱ्याला पहिल्यांदा नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊन चालढकल करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई होणार का? व पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन खरोखर न्याय मिळणार का?.

महागडे बियाणे खरेदी करून कांदा लागवड केली. अवकाळी पाऊस ,धुके व ढगाळ हवामानात काळजी घेतली .मात्र दुकानदाराच्या चुकीमुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मला नुकसान भरपाई मिळावी. -ज्ञानदेव रणदिवे, पीडित शेतकरी.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com