अभिरूची त्रिधारा

अभिरूची त्रिधारा
Published on

त्रिधारा
अभिरूची
डॉ. संजय नगरकर

आध्यात्मिक लोकशाही व महानुभाव आचारधर्म

श्री चक्रधर स्वामी संस्थापित ‘महानुभाव संप्रदाया’त स्त्री-पुरुष भेद, वर्णभेद, पंगती भेद यांना थारा नव्हता. श्री चक्रधरांचे गुरू श्री गोविंदप्रभू (गुंडम राऊळ) यांचा सर्वांच्या घरी संचार असल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात येतो. “राऊळ मातंग: महारांचा घरोघरी विचराताति: आणि तैसेचि दिक्षिता ब्राह्मणांचा घरी विचरताति :” (गोविंदप्रभूचरित्र, ४७ ) महार, मांगही त्यामुळे त्यांना मायबाप मानीत.

नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय यांच्यातील दुवा म्हणजे चांगदेव राऊळ होत. यांचे वास्तव्य ज्या वस्तीत असे तिथे पहाटे उठल्यापासून दुपारपर्यंत खराट्याने त्या वस्तीची साफसफाई ते करीत. म्हणजेच वर्णव्यवस्थेत जे कर्म हीन, शूद्र यांचे समजले जाई ते कर्म चांगदेव राऊळ धर्मविधी म्हणून करीत. आपल्या अनुयायांना महानुभाव संप्रदायाची दीक्षा देताना हातातील झाडूने शिष्यांच्या डोक्यावर मारीत. जेणेकरून त्याने आपले हे सेवाव्रत पुढे चालू ठेवावे. आधुनिक काळातील मानवतावादी संत गाडगेबाबा यांच्या वर्तनाची नाळ वरील सूत्रात सापडते.

लीळाचरित्राच्या उत्तरार्धात ५७ व्या लीळेत चक्रधरांनी स्पृश्य-अस्पृश्य भेद न मानता एका मातंगाने दिलेला लाडू खाल्ला, अशी आठवण येते.
महारवाड्यातही ज्ञानी पुरुष असेल तर त्याचा शोध घ्यावा हे सांगताना सूत्रपाठाच्या आचारमालिकेतील १४९ व्या सूत्रात “महारवाडाहौनी धर्मु काढावा :” असे आचारसूत्र येते. यावरून धर्मज्ञान ही कोणा एकाची मक्तेदारी नसून, जातीवरुन व्यक्तीची श्रेष्ट- कनिष्ठता न पाहता अस्पृश्यांच्या वस्तीतदेखील प्रतिभाशाली, प्रज्ञावंत सुप्त स्वरूपात असू शकतात. फक्त वर्णभेदामुळे व ज्ञानबंदीमुळे ते वंचित राहिले आहेत. त्यांचा शोध अशा वाड्या-वस्त्यातून घेण्याचा आदेश श्री चक्रधरांनी दिला होता.
स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करताना श्री चक्रधर स्वामी यांनी आपला अनुयायी सारंग पंडित यांच्या मनातील संशयाचे किल्मिष कसे दूर केले? त्याची एक लीळा येते. एकदा स्त्रियांच्या कोंडाळ्यात श्री चक्रधर निरुपण करीत असताना, सारंग पंडित यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. तेव्हा स्त्रियांना धर्मात प्रवेश का नसावा? “तुमचा काय तो जीव आणि यांचा काय जीव नाही. तुम्हाला राखणारा देव कोणी वेगळा आहे आणि यांना राखणारा देव काय वेगळा आहे?” (लीळाचरित्र, उत्तरार्ध ८५) असे स्पष्टपणे सांगतात.
स्वातंत्र्याचा पुरस्कार व पारतंत्र्याचा धिक्कार करताना “स्वातंत्र्यु हा मोक्षु : पारतंत्र्यु हा बंधू :” (सूत्रपाठ, आचारमालिका १) असा स्वातंत्र्याचा पुरस्कार येतो.
व्रतवैकल्य, यात्रा-जत्रा या काहीच कामाच्या नाहीत. त्यामुळे आपल्या अनुयायांनी त्या निषिद्ध मानाव्यात. हे सांगताना “तुम्ही जात्रे क्षेत्रा न वचावे :” (सूत्रपाठ, आचारमालिका १९) असा दंडक त्यांनी घालून दिला.
वैराग्यशीलता व अहिंसा धर्माचा पुरस्कार करताना त्याबाबत कडक आचरण कसे असावे? याविषयी श्री चक्रधरांनी “विषयाचा संगू न करावा:”, “तुमचेनि मुंगी रांड न होआवी :” “चित्रीचीही स्त्री न पहावी :” असे दंडक घालून दिले.
थोडक्यात रोटीबंदी, भाषाबंदी, ज्ञानबंदी, स्त्री-पुरुष विषमता, जातीभेद, व्रतवैकल्य, यात्रा-जत्रांमुळे नागवला जाणारा सर्वसामान्य वर्ग यांना आध्यात्मिक ज्ञानाची कवाडे खुली करून देताना, समता, स्वातंत्र्य, सेवा, वैराग्यशीलता, अहिंसा, मानवता या आचारमूल्यांच्या माध्यमातून ‘महानुभाव संप्रदाय’ या प्रवाहाद्वारे ‘आध्यात्मिक लोकशाही’ची परंपरा अधिक विकसित झाली.

- प्राचार्य डॉ. संजय नगरकर
९०९६८७५७३७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com