
मांजरी गावठाणात मिळणार पाण्याच्या टाक्या आणि टँकर
मांजरी : यापूर्वी अश्वासन देऊनही पालिकेने पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. त्याबाबत येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा मागणी मान्य करीत अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे अश्वासन दिले आहे.
येथील मांजराईनगर भागातील ७२ घरकुल, ११६ घरकुल, सटवाई नगर, राजीव गांधी नगर, वेताळ वस्ती, कुंजीर वस्ती, माळवाडी आदी भागांसह गावठाणामध्ये पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी दुरापास्त झाले आहे. रहिवाशांची त्यामुळे मोठी परवड होत असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील पाणी प्रश्नावर पालिकेसमोर अनेकवेळा आंदोलने झाली आहेत.
मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पालिकेकडून पाण्याचे दररोज दहा ते बारा टँकर व ५० साठवण टाक्या देण्याचे ठरले होते. मात्र, आजपर्यंत नियमित व पुरेसा पाणीपुरवठाही होत नाही व पाण्याच्या टाक्याही बसलेल्या नाहीत, त्यामुळे आम आदमी पार्टीचे प्रभागाध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता.
यावेळी गंगाराम खरात, अक्षय गाडे, निखिल गायकवाड, मंगेश माकर, राजेंद्र कुंभार, रूपाली खरात, वैशाली साळवे, सविता सोनवणे, रुक्मिणी लोणकर, पारुबाई भोकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, अधिक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे म्हणाले, "यापूर्वी वीस टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत.
उर्वरित तीस पाण्याच्या टाक्या लोखंडी स्टँड सह त्वरित बसवण्यात येतील. मांजराईदेवी समोरील विहिरीमध्ये वापरण्याचे पाणी रोज टाकून झोपडपट्टी भागात पुरवले जाईल. परिसरातील ११६ घरकुल, ७२ घरकुल, सटवाई नगर, राजीव गांधी नगर, वेताळ वस्ती, कुंजीर वस्ती, माळवाडी व गावठाण मध्ये नियमित पाण्याचे टँकर पाठविले जातील.