एकाच्या डोक्यातून रक्त निघाले तर दहा मिनिटांत राज्य बंद पाडा

एकाच्या डोक्यातून रक्त निघाले तर दहा मिनिटांत राज्य बंद पाडा
Published on

...तर दहा मिनिटांत राज्य बंद पाडा

मनोज जरांगे : मुंबईला जाण्यावर ठाम; शनिवारी बैठक

सकाळ वृत्तसेवा
जालना, ता. ७ :  ‘‘मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा, मुंबईला जाण्याची तारीख निश्चित करण्यासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शनिवारी (ता. १२) होणाऱ्या बैठकीला गावागावांतील मराठा आंदोलकांनी यावे. मुंबईकडे जाताना फडणवीस सरकारने अडविले, पोलिसांच्या माध्यमातून एकाच्याही डोक्यातून रक्त काढले तर मराठ्यांनी दहा मिनिटांमध्ये राज्य बंद पाडावे,’’ असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केले.

उपोषणाच्या दहाव्या दिवशी, सोमवारी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणासाठी हे निर्णायक आंदोलन आहे. शासनाने आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.  १२ सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबई गाठणारच. पुढील एक ते दोन दिवस अंतरवाली सराटीत कुणी आले नाही तरी चालेल. पण १२ सप्टेंबरच्या बैठकीसाठी मराठ्यांनी यावे. गुन्हे दाखल होतील, याची कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी माझ्यासोबत येऊ नये.’’

-------
फडणवीस यांच्यावर टीका

‘‘देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शिवसेना, उद्धव ठाकरे यांना संपवले. एवढेच नाही तर भाजपमधील अनेक नेत्यांना संपवले. महाविकास आघाडीचे सर्व नेते फोडले.  अनेक घराणी गप्प केली,’’ अशी टीका जरांगे यांनी केली. ते म्हणाले, की कुणबी नोंदीसाठी ‘हैदराबाद गॅझेटियर’संदर्भात ‘जीआर’ निघाल्यानंतर फडणवीस यांनी दोन महिन्यांनंतर मला फोन केला होता.  ‘हैदराबाद गॅझेटियर’मधील नोंदीनुसार मराठवाड्यातील बहुतांश मराठा  आरक्षणात आणणार, असा शब्द दिला होता. हे जर खोटे असेल तर त्यांनी  त्यांच्या मुलीची शपथ घ्यावी. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास हे सरकार पाडू आणि आरक्षण देईल त्याला सत्तेवर आणू, असा निर्धारही जरांगेंनी व्यक्त केला.
----
जरांगे म्हणाले...
--
- १२ सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबई गाठणार
- याच दिवशी (ता. १२) मुंबईला जाण्याची तारीख निश्चितीसाठी अंतरवाली सराटीत बैठक
- बैठकीला राज्यभरातील मराठा आंदोलकांनी यावे
- वडीगोद्रीपर्यंत ध्वनिवर्धकांची व्यवस्था
- अंतरवाली सराटीतील पार्किंग व्यवस्था बंद ठेवून तेथे ‘एलईडी स्क्रीन’
- वडीगोद्रीपासून अंतरवालीपर्यंत चालत या. जागा मिळेल तेथे थांबा.
- राज्यातील प्रत्येक घरातून एक मराठा आंदोलक आलाच पाहिजे.
- तारीख निश्चितीनंतर थेट ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा, कोण अडवतो ते पाहतो
- पोलिसांनी ‘बॅरिकेड्स’ लावले तर ते बाजूला करून जा
- पोलिसांनी काठी मारली तर पळू नका, पळाल्यास चेंगराचेंगरीची शक्यता असते.
- पोलिसांची काठी पकडा. स्थिती खूप  बिघडली तर मागे पळा, पण दबा धरून बसा
- पोलिसांच्या काठीने एकाच्याही डोक्यातून रक्त निघाले तर दहा मिनिटांच्या आत राज्य बंद पाडा
- बंद पडलेले राज्य पुन्हा सुरू होणार नाही, याची दक्षता गावाकडे राहिलेल्या मराठा आंदोलकांनी घ्यावी
- महामार्ग, रेल्वे अडवायच्या. दिवसा आंदोलन करताना अडचणी आल्या तर रात्री रस्ते बंद करा
- मुंबईत जाळपोळ, दगडफेक असे प्रकार करायचे नाहीत
- मुंबईत आंदोलक शिरल्यानंतर प्रत्येक राजकीय नेत्याच्या घरासमोर महिला, वृद्धांनी ठिय्या आंदोलन करावे
- गावाकडे थांबलेल्यांनी आपल्या शिवारातून जाणारे मार्ग, रेल्वे अडवायच्या
- मुंबईत गेलेल्यांसाठी भाकरी, पाण्याचा पुरवठा करायचा

Marathi News Esakal
www.esakal.com