दहावीच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत संमिश्र भावना

SSC Exam
SSC ExamSakal

पुणे : कोरोनाच्या सद्यस्थितीचा विचार करता दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय योग्य आहे. तर स्वतंत्र ‘सीईटी’मुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न निकाली लागणार आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. तर अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीचा निकाल लावताना गुंता अधिक वाढणार आहे. त्याशिवाय अकरावीसाठी प्रवेश परीक्षा होते, तसेच निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार असेल, तर मग दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे शक्य होते, असे काही शिक्षणतज्ञांना वाटत आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि अकरावीसाठी होणारी ‘सीईटी’याबाबत शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  

अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल देणे योग्य

राज्यातील सध्याच्या स्थिती आणि विद्यार्थ्यांचा विचार करता दहावीचे अंतर्गत मुल्यमापन आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे निवृत्त शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांचा शाळेतील कामगिरी काय हे आता दहावीच्या निकालासाठी महत्त्वाचे असणार आहे. सद्यस्थितीचा विचार करता आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे १०० गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत घेतलेला निर्णय संयुक्तिक आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणेही योग्य आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येणे शक्य होईल.’’

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले,‘‘दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत असणाऱ्या सर्व शंकांचा उहापोह झाला. मूल्यमापन करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही, नियोजन काय करायचे, हे सविस्तर सांगण्यात आले आहे. मात्र, अकरावीचखी प्रवेश परीक्षा घेणारच आहे, मग हा निकालाचा मार्ग कशासाठी, असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण दहावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र हा स्वतंत्र विषय आहे. अकरावी प्रवेशाचा विचार केल्यास विविध अभ्यासक्रम पाहता प्रवेश परीक्षा आवश्यक आहे.’’

मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीने वाढला गुंता; योग्य निकालावर प्रश्नचिन्ह

शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले,‘‘सरकारने घाई-घाईने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर केली आहे. नववीच्या गुणांच्या आधारे ५० गुण द्यायला हरकत नाही. कारण गेल्यावर्षी नववीची पहिली सत्र परीक्षा आणि घटक चाचणी झाली आहे. परंतु लेखी परीक्षेचे ३० गुण आणि तोंडी परीक्षेचे २० गुण कसे देणार! राज्यातील जवळपास ४० टक्के शाळांमध्ये लेखी परीक्षा झालेली नाही. मग या गुणांचे सार्वत्रिकरण कसे होणार हा प्रश्न आहे. तोंडी परीक्षा झाली नाही, गुण देण्यासाठी आता या परीक्षा कशा घ्यायच्या हेही शाळांना कळत नाहीये. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे.’’

एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक (नाव न लिहिण्याच्या अटीवरून) म्हणाले,‘‘नववीची परीक्षा विद्यार्थी फारशा गांभीर्याने देत नाहीत. बहुतांश विद्यार्थी दहावीला बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ती गांभीर्याने देतात. त्यामुळे त्या आधारे मूल्यामापन करण्यासाठी ५० गुण देणे, हे योग्य वाटत नाही. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन कि ऑनलाइन होणार,हे अद्याप स्पष्ट नाही. मग त्याएवजी दहावीच्या उत्तीर्णतेसाठी सर्व विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेणे शक्य होते.’’

‘‘इयत्ता नववीच्या आधारे मूल्यमापन करणे शक्य असले, तरी विद्यार्थी फारश्या गांभीर्याने ही परीक्षा देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एकूण निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मध्यतंरी जवळपास ४२ दिवसांसाठी शाळा सुरू झाल्या होत्या. या काळात बहुतेक शाळांनी सराव परीक्षा घेतल्या आहेत. त्या आधारे लेखी परीक्षेचे गुण देणे सोयीचे होईल.’’

- दिलीप रावडे, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com